
लोकशाही संपादकीय लेख
जळगाव महानगरपालिका प्रशासनाची 17 मजली इमारती संदर्भात जळगावकरांची मान अभिमानाने ताठ होत असली, तरी मनपाच्या ढिसाळ प्रशासनाने ती मान खाली घालवली आहे. एक काळ असा होता जळगाव नगरपालिकेच्या 17 माजली इमारतीचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात कौतुक होत होते. एकाच इमारतीत सर्व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 17 मजली प्रशासकीय इमारत बांधली गेली. तथापि हे सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी असले, तरी आमच्या मनपा प्रशासनाने ती गैरसोयीची बनवली आहे, हे आता खेदाने म्हणावे लागते. 17 मजली इमारतीत विविध विभागात जाण्यासाठी जनतेच्या सोयीसाठी एकूण सहा लिफ्ट बसविण्यात आल्या असल्या, तरी सहा पैकी फक्त तीन लिफ्ट चालू असून तीन लिफ्ट बंद आहेत. यात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करावी की, काय? असा प्रश्न उपस्थित होतो. कार्यरत असलेल्या तीन लिफ्ट पैकी एक लिफ्ट अधिकारी आणि व्हीआयपी व्यक्तींसाठी वापरण्यात येते. या व्हीआयपी लिफ्ट वरच फक्त लिफ्टमन आहे. बाकी दोन लिफ्ट या सर्वसामान्यांसाठी असून त्यामध्ये लिफ्ट मन नसतो. आणि सर्वसामान्यांसाठी असलेल्या लिफ्टचाच मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आज अचानक एक लिफ्ट खाली येत असतांना 10 व्या मजल्यावरून कोसळली. त्यात जावेद शेख आणि जलील अहमद हे दोन व्यक्ती आपल्या प्रमाणपत्राचे काम आटवून लिफ्टने तळमजल्यावर येत होते. मोठ्या आवाजाने अख्खे 17 मजली इमारतीतील मनापा प्रशासन हादरले. सर्वांची धावपळ सुरू झाली. मेंटेनन्स विभागाचे योगेश बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही या कोसळलेल्या लिफ्टकडे धाव घेतली. दहाव्या मधल्या वरून नवव्या मजल्यावर कोसळलेल्या लिफ्ट मध्ये अडकलेल्या दोघांचा जीव सुदैवाने वाचला. तब्बल 28 मिनिटांच्या प्रयत्नानंतर लिफ्ट मधून या दोघांना अखेर लिफ्टचा दरवाजा तोडून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. लिफ्टमध्ये अडकण्याचा अथवा लिफ्ट मध्येच बंद पडण्याचा प्रकार मनपात यापूर्वी सुद्धा झालेला आहे. परंतु असा प्रकार होणार नाही यासंदर्भात मनपा प्रशासनाकडून काहीही उपाययोजना केली गेली नाही. आज सुदैवाने लिफ्ट मध्ये अडकलेल्या दोघांचा जीव वाचला, म्हणून हायसे वाटत असेल तर या दोघांचा जीव गेला असता तर काय झाले असते? याचा विचार न केलेलाच बरा. त्यामुळे मनपाच्या प्रशासनाकडून जळगावकरांच्या नागरी सुविधा समाधानकारक पार पाडल्या जात नाहीत, ही तर बोंब आहेच; पण मनापाच्या अंतर्गत प्रशासनाबाबत सुद्धा त्यांचा ढिसाळ कारभार दिसून येतो. अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता जाब विचारण्याची खरी गरज आहे..
या लिफ्ट संदर्भात प्रशासनाने केलेल्या भोंगळ कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. एकंदरीत सहा लिफ्ट असताना तीन लिफ्ट बंद का आहेत? काटकसरी साठी बंद केलेल्या आहेत की अन्य दुसरे कारण आहे? ते प्रशासनाने जाहीर केले पाहिजे. कार्यरत असलेल्या तीन लिफ्ट पैकी एक लिफ्ट अधिकारी आणि व्हीआयपी साठी असून बाकी दोनच सर्वसामान्यांसाठी आहे. त्याचे कारण काय? तसेच व्हीआयपी लिफ्ट मध्येच फक्त लिफ्ट मन असतो इतर दोन लिफ्ट मध्ये लिफ्टमन का नाही? त्याचे सुद्धा कारण जाहीर करावे. कारण सर्वसामान्यांच्या लिफ्टवरच मोठी गर्दी असते. तेथे लिफ्टमन असणे आवश्यक नाही काय? जळगावच्या सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जीव प्यारा नाही का? फक्त व्हीआयपीच्या जीवाचीच काळजी मनपा प्रशासन घेते का? आज जर सर्वसामान्यांच्या लिफ्टमध्ये लिफ्टमन असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती. सर्वसामान्य लिफ्टसाठी जनतेची गर्दी असते. अनेक वेळा त्यांना रांगेत उभे राहून लिफ्टमध्ये नंबर लावावा लागतो. बऱ्याचदा नंबर लावूनही लिफ्ट मध्ये जाण्याची संधी मिळत नाही. अखेर पायऱ्यांचा वापर करून अनेक लोक आपल्या कामासाठी आलेल्या मजल्यावर जातात, हा भाग वेगळाच आहे. त्यामुळे दोन लिफ्ट जनतेसाठी अपुऱ्या पडतात, त्यामुळे इतर तीन बंद लिफ्ट चालू का केल्या जात नाहीत? हा प्रश्न प्रशासनाला विचारणार कोण? आज जळगावत महापालिकेत कोसळलेल्या लिफ्टची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आणि जळगाव मनपा प्रशासनाचे धिंडवडे निघाले. याला जबाबदार प्रशासकीय अधिकारी नाहीत का? 17 मजली प्रशासकीय इमारतीचे प्रशासन सांभाळण्यात अधिकारी असमर्थ आहेत असेच म्हणावे काय..?

