लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरासाठी अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पुणे आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
खंडाळा घाट परिसरातील मिसिंग लिंक भागात दरड कोसळल्याने रस्ते वाहतूक आधीच विस्कळीत झाली होती. त्यातच मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे धावणाऱ्या अनेक गाड्यांची वाहतूक प्रभावित झाली असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेल्वेने जारी केलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस आणि सिंहगड एक्सप्रेससह अनेक महत्त्वाच्या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई-धुळे एक्सप्रेस आणि पुणे-सोलापूर एक्सप्रेसचाही समावेश रद्द करण्यात आलेल्या गाड्यांच्या यादीत आहे. पुणे आणि लोणावळा दरम्यान धावणाऱ्या 99806 आणि 99805 या लोकल गाड्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
दरम्यान, काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. अहमदाबाद-कोल्हापूर, इंदूर-दौंड, अहमदाबाद-पुणे तसेच इतर अनेक गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड आणि दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांच्या प्रवासाच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. काही गाड्यांचा प्रवास मूळ अंतिम स्थानकापूर्वीच थांबवण्यात आला आहे. तर काही गाड्या त्यांच्या मूळ प्रारंभ स्थानकाऐवजी पुणे, लोणावळा किंवा पनवेल येथून सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय काही गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.


