लोकशाही न्युज नेटवर्क
मागील काळात आमची पिपल्स रिब्लिकन पार्टी महाविकास आघाडीत सामील झाली आहे. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात उपेक्षा झाल्या. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या धाडसी मुख्यमंत्री पाहिला नाही. बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या १६ आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार असतांना व शिंदे फडणवीस सरकार टिकेल की नाही याची खात्री नसतांना गेल्या ४ – ५ महिन्यांपासून शिंदे फडणवीस सरकार अतिशय चांगले निर्णय घेत असून एकनाथ शिंदे यांचे धाडस पाहून आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे गटाशी आघाडी केल्याची माहिती लाॅंग मार्चचे प्रणेते पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पाचोरा येथील जनता वसाहत मध्ये एका कार्यक्रमास उपस्थिती लावण्यापूर्वी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आमदार किशोर पाटील, आंबेडकरी नेते सुरेश सावंत, पिपल्स रिब्लिकन पार्टीचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, उल्हासनगरचे नगरसेवक नाना बागुल, आर. पी. आय. चे संपर्कप्रमुख राजू मोरे, नारायण सपकाळे, महानगराध्यक्ष कलपेश मोरे, बाबुराव वाघ, सिद्धांत मोरे, काँग्रेसचे विकास वाघ, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, किशोर बारवकर, आयोजक प्रवीण ब्राह्मणे, गणेश पाटील उपस्थित होते.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले की, आम्ही उपेक्षित व वंचितांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाडस पाहून सामील झालो आहोत. गेल्या सरकारामध्ये आमचे शिवसेनेशी काही घेणे नसतांना राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्याकडे पाहून आघाडीत सामील झालो होतो. मात्र सत्तेत असलेल्या व बाहेरून पाठिंबा दिलेल्या घटकांची सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक समिती गठीत करावी व त्या समितीत सरकारला पाठिंबा देणाऱ्या घटक पक्षांचे सदस्य घ्यावेत. याशिवाय गेल्या अडीच वर्षांपासून मागासवर्गीय व ओ. बी. सी. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न सुटू शकला नाही. वंचित बहुजन नागरिकांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केले असतांना ते अतिक्रमण नियमित करण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही असे विविध प्रश्नांची महाआघडीकडून उपेक्षा झाली. राज्याचे मुख्यमंत्री हे सर्व सामान्यांना सोबत घेऊन व न्याय देण्याचे काम करत असल्याने व भविष्यातील सर्व निवडणुकांमध्ये घटक पक्षांना सोबत घेऊन आणि विशिष्ट जागा देऊन सन्मान राखणार असल्याचा विश्वास असल्याने आम्ही बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री यांच्यामुळे शिंदे गटात सामील झाले असल्याची माहिती प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी दिली. उपस्थितांचे आभार आमदार किशोर पाटील यांनी मानले.