कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
कोल्हापूरमध्ये महाप्रसादाच्या खिरीतून २०० पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथील ही घटना आहे. प्रकृती खालावलेल्या सर्वांना इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडीमध्ये २०० पेक्षा अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाली. या सर्व नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. शिवनाकवाडी गावात यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीतून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे.
खीर खाल्ल्यानंतर नागरिकांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून गावात वैद्यकीय पथक दाखल झालेले आहेत. तर १०० हून अधिक रुग्णांना इचलकरंजी इथल्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.