लोकशाही न्यूज नेटवर्क

कल्याण पश्चिमेत गाडी बाजूला घेण्यावरून झालेल्या वादानंतर विद्यार्थ्याला गोदामात डांबून मारहाण केल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या साथीदारांवर आरोप करण्यात आला.
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून कल्याण पश्चिमेत एका विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला गोदामात डांबून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या साथीदारांवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार १३ ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख आणि त्याचे मित्र एका ठिकाणी गेले असताना गाडी बाजूला घेण्यावरून त्यांचा काही तरुणांशी वाद झाला होता. त्यानंतर हरवलेले पाकीट शोधण्यासाठी विद्यार्थी पुन्हा त्या परिसरात गेले असता १५ ते २० जणांच्या टोळक्याने त्यांना घेरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या हल्ल्यात लाठी, बांबू आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. अथर्व देशमुख याला रस्त्यावरून उचलून नेत एका गोदामात डांबण्यात आले आणि तेथे त्याच्या शर्टाचे तुकडे होईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या मारहाणीत अथर्वच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे.
आपल्या मुलाला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच अथर्वचे वडील सागर देशमुख यांनी थेट गोदामात धाव घेत मुलाची सुटका केली. “आणखी पाच मिनिटे उशीर झाला असता, तर माझा मुलगा जिवंत राहिला नसता,” अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या घटनेप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गंभीर जखमी झालेल्या अथर्वची तक्रार योग्य प्रकारे न घेतल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसांनी पीडित तरुणाचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
मात्र, १३ ऑगस्ट रोजी घटना घडूनही अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे जखमी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणात पोलीस आरोपींवर कडक कारवाई करून त्यांना कधी अटक करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.


