सम्यक आहात, व्यायाम शरीरासाठी आवश्यक !

विद्यापिठात व्याख्यान : आहार तज्ज्ञ डॉ. दीक्षित यांचे आवाहन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मधुमेह आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत सुधारणा करण्याची गरज असून सम्यक आहार आणि व्यायाम करावा असे आवाहन सुप्रसिध्द आहार तज्ज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखा प्रशाळेतील योगशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘चांगल्या आणि सर्वांगिण आरोग्याच्या दृष्टीने’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय होता. कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्रशाळेच्या संचालक डॉ.मनिषा इंदाणी, विभागप्रमुख राजेश पाटील उपस्थित होते.

डॉ.दीक्षित म्हणाले की, मधुमेह होण्याच्या खुप आधी शरीरात इन्सुलिन वाढलेले असते. इन्सुलिनची पातळी वाढली की वजन वाढते. इन्सुलिन कमी झाले तर वजन कमी होते. प्रत्येक वेळी खाल्ल्याने इन्सुलिन वाढते. भरपूर खाण्यासाठी माणसाचे शरीर निर्माण झालेले नाही. लोक अनावश्यक खातात त्यामुळे खाण्यावर नियंत्रण हवे. हे सांगतांना डॉ.दीक्षित यांनी दीक्षित लाईफ स्टाईलबद्दल सविस्तर माहिती दिली. 55 मिनीटात जेवण पूर्ण करा, दिवसातून दोनच वेळा जेवण करा नियमित 45 मिनीटे पायी चाला. गोड पदार्थानपासून दूर रहा. खाण्यात कार्बोहैड्रेड कमी करा आणि प्रोटीन वाढवा. मधुमेह निश्चितच नाहीसा होऊ शकतो असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांनी मानसिक व शारीरिक आरोग्य हीच आपली संपत्ती असल्याचे सांगितले. प्रारंभी डॉ.मनिषा इंदाणी यांनी प्रास्ताविक तर सुत्रसंचालन डॉ. लिना चौधरी यांनी केले. राजेश पाटील यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.