मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. त्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचा समावेश होता. यावेळी जयंत पाटील यांनी खळबळजनक विधान केले.
जयंत पाटील म्हणाले की, माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका. लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझे ऐकले असते तर ते खासदार राहिले असते. ते माझा सल्ला ऐकत नाही. आपली एकी कायम ठेवा. संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
भाषणात जयंत पाटील यांनी राजकीय फटकेबाजी करत सरकारला घेरले. विधानसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला आहे. राजू शेट्टी यांना माहिती आहे, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना चांगला अनुभव आला आहे. आम्ही भाषण करुन दमलो आहोत. कारण लोकांना पैसे देऊन शांत केले जाते.तसेच हिंदुत्व समोर असते. मग तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल. कोणाची मागणी नसताना नवीन मार्ग तयार केले जात आहे. विकासाला आमचा विरोध नाही. पण सरकार नवे, नवे रस्ते करण्यात का इंट्रेस्ट घेत हे कळत नाही. मोठ मोठे प्रकल्प घ्यायचे, त्यातून निधी उपलब्ध करायचा, असा प्रकार सुरु आहे. पण ज्याची जमीन जात असेल त्यांचा उपजिविकेचा प्रश्न निर्माण होतो. सरकार जमिनीचे पैसे देते, मग मॅनेज होत असाल तर पाहते. परंतु आम्हाला जमीन वाचवायची आहे, पैसे नको, असे शेतकरी सांगत आहे. असे जयंत पाटील म्हणाले.