अहिल्यानगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात कावीळची साथ पसरली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या राजुर या गावात काविळीच्या साथीने जोर धरला असून गेल्या काही दिवसातच १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे . पाणीटंचाईचे सावट अनेक भागात पसरले आहे. तर काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत आहे. अशात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला असून अकोले तालुक्यातील राजूर गावात कावीळ रोगाची साथ पसरली आहे. एकाच गावात आतापर्यंत जवळपास शंभरहून अधिक रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
अनेकांना संगमनेर, राजूर आणि अकोले येथील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. या साथीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आदिवासी बहुल अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळीच्या आजाराने थैमान घातले आहे. राजूर आणि परिसरात गेल्या काही दिवसातच १०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली असून त्यांच्यावर विविध शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. आरोग्य पथक राजूर गावात दाखल झाले असून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे.
दूषित पाण्यामुळे काविळची साथ पसरल्याचा प्राथमिक अंदाज असून ग्रामपंचायतला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीतील आणि इतर जलस्रोतांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारण समोर येईल. दरम्यान ग्रामस्थांनी पाणी उकळून प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी; असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.