पोलीस कर्मचाऱ्याकडून लग्नाचे आमिष देऊन पाच वर्षे अत्याचार; कोलकात्यातील महिलेची जळगाव पोलिसात तक्रार
जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क

सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर, पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे खोटे आश्वासन देत पाच वर्षांहून अधिक काळ एका महिलेसोबत अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिला कोलकात्यातील असून, तिने जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सूत्रांची दिलेली महिती अशी कि , या प्रकरणातील मुख्य आरोपी नितीन सपकाळे हा जळगाव पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१७ साली फेसबुकवरून ओळख झाल्यानंतर नितीनने स्वतःला अविवाहित असल्याचे भासवले आणि लग्नाचे आमिष देत मैत्री केली.
महिलेने नितीनवर विश्वास ठेवून कोलकाताहून अनेकदा जळगाव गाठले. या दरम्यान, तिच्या इच्छेविरुद्ध नितीनने हॉटेल्समध्ये नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप आहे.
२०२० मध्ये पीडितेला नितीन आधीच विवाहित असून त्याला मुलगी असल्याचे समजले. त्यानंतरही त्याने पत्नीला घटस्फोट देतो, असे सांगून तिची फसवणूक चालूच ठेवली.
२०२५ मध्ये नितीनने स्पष्टपणे लग्नास नकार दिला. त्यानंतर, त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी पीडित महिलेवर दबाव आणून एका मंदिरात जबरदस्तीने लग्न लावून दिले, परंतु काही दिवसांतच हे लग्न अमान्य ठरवत तिला सोडून दिले.
२३ सप्टेंबर रोजी पीडितेने वकिलांच्या मदतीने तक्रार दाखल केली. या प्रकरणी नितीन सपकाळे, त्याची पत्नी आणि आई या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम 376 (अत्याचार), 417 (फसवणूक), 506 (धमकी) आदी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.


