जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

नागरिकांचे जीवनमान अधिक सुकर करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने एक अभिनव उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना दररोज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार आहे.
या उपक्रमाचा उद्देश नागरिक, ग्रामस्थ यांना त्यांच्या अडचणी, तक्रारी किंवा सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे नागरिकांना जिल्हा परिषद कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही, तर ते घरबसल्या संवाद साधू शकतील.
या उपक्रमाची खास वैशिष्ट्ये म्हणजे दररोज सकाळी 10 ते 11 या वेळेत संवाद साधण्याची सुविधा, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्काची संधी, दररोज वरिष्ठ अधिकारी नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकणार आहेत, ऐकलेल्या तक्रारी तत्काळ संबंधित विभागाकडे पाठवून त्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. प्राप्त तक्रारींचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी स्वत: घेणार असून, समस्यांचे तडीस नेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार आहे. तक्रारींची त्वरित नोंदणी आणि प्रभावी निराकरणासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे.
संवादासाठी आवश्यक लिंक आणि QR कोड जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.zpjalgaon.com उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

