जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यात अवकाळीचे संकट आले आहे. काल सोमवारी (५ मे) रात्री जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा व चाळीसगावसह इतर काही ठिकाणी अचानक गारपीट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. या नैसर्गिक आपत्तीत रब्बी हंगामातील केळी, ज्वारी, मका आणि बाजरी यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवारी वादळी वारा, गारपीट आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसाचा अमळनेर शहरालाही मोठा फटका बसला आहे. पिकांची कापणी काहीच दिवसांवर आलेली असताना झालेले हे नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण आहे. तालुक्यात गारांमुळे केळी पिकांचे ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले असून, केळीची घडं जमीनदोस्त झाली.
आडगाव ता. चाळीसगाव परिसराला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले तर खेडगाव ता. भडगाव येथे सोमवारी पहाटे चार वाजता विजांच्या गडगडाटासह पाच ते दहा मिनिटे अवकाळी पाऊस झाला. चाळीसगाव तालुक्यातील आडगावसह परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. काढणीवर आलेला शेतमाल व गुरांचा चारा कुट्टी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.