मासिक पाळीत स्वयंपाक न केल्याचा राग

सासू नणंदेकडून छळ; विवाहितेने संपवले जीवन !, रुग्णालयात भावाचा आक्रोश

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मासिक पाळीत स्वयंपाक केला नाही या कारणाने सासू आणि नणंदेकडून छळ झाल्याने कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील किनोद गावात राहणाऱ्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. विवाहितेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्या असून विवाहितेची सासू आणि नणंद या दोघींनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.

गायत्री कोळी असे मृत महिलेचे नाव आहे . गेल्या काही महिन्यांपासून माहेरून पैशाची मागणी केली जात होती. तसेच किरकोळ कारणांवरून तिला सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता असा आरोप केला जात आहे. महिलेच्या मृत्यूनंतर माहेरच यांनी केलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहेे. पैशाच्या त्रासातून मानसिक त्रास दिला जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्या तपासात समोर आला आहे.

चोपडा तालुक्यातील माहेर असलेल्या गायत्री कोळी या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर विवाहितेच्या माहेरच्यांनी तडक किनोद येथे धाव घेतली. बहिणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याचे कळताच विवाहितेचा भाऊ आणि मावशी दोघांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला. महिलेच्या अंगावर खुणा आणि जखमा आढळून आल्याने सासू आणि नणंद या दोघींनी गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या भावाने आणि मावशीने केला आहे .

 

सासरच्यांकडून पैशांचा तगादा

गायत्रीच्या भावाने म्हणजेच सागर कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार,गेल्या अनेक दिवसांपासून माहेरून पैसे आणण्यावरून सासरी गायत्रीचा छळ होत होता.किरकोळ कारणांवरून शिवीगाळ,मारहाण केली जात होती.मासिक पाळी असल्याने सासरचे लोक तिने केलेला स्वयंपाक ही खात नसल्याने आपल्या बहिणीने मासिक पाळी सुरू असल्याने स्वयंपाक केला नव्हता. या कारणावरून सासू आणि नणंद या दोघींनी बहिणीला शिवीगाळ करून मानसिक त्रास दिल्याने तसेच मारहाण केल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप मृत विवाहितेच्या भावाने केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.