जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मनपाच्या विविध विभागात चोऱ्या, भ्रष्टाचार, अनियमितता इत्यादी बाबत अनेक पत्र तत्कालीन आयुक्त सतिष कुलकर्णी व विद्यमान आयुक्त यांना देखील देण्यात आलेली आहे. परंतु केवळ कार्यवाही प्रस्तावित आहे. असे नेहमी लेखी पत्राव्दारे अर्जदारास कळविण्यात आले आहे.
मनपात मनपाअंतर्गत भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन होवून दोन वर्षांचा कालावधी होवून गेला, परंतु समितीने कोणत्याही भ्रष्टाचाराचे प्रकरण मार्गी लावलेले दिसून येत नाही. भ्रष्टाचार कसा संपेल यापेक्षा भ्रष्टाचार कसा होईल यासाठी प्रशासन प्रयत्नशिल असल्याचे दिसून येते. याचा अर्थ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे त्यांच्या पदाशी, नागरीकांशी व शासनाशी प्रामाणिक नाहीत. अशा बेकायदेशीर बाबींना प्रशासनातर्फे संरक्षण देण्यात येत असेल तर सदर समिती बरखास्त केलेली बरी अशा आशयाचे पत्र सामाजिक कार्यकर्ते कॉ. अनिल नाटेकर यांनी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
प्रशासकिय इमारतीमधील ३४ नग एक्झॉस फॅन चोरी प्रकरण, प्रशासकिय इमारतीमधील व्होल्टास वॉटर कुलर ३२ नग व अॅक्वागार्ड चोरी प्रकरण, विधी शाखा व नगररचना विभाग येथील ५२ लाख रूपये अनियमितता प्रकरण, मनपाच्या आस्थापनेवरील बोगस / वारसाहक्क / अनुकंपा प्रकरण, आस्थापना विभागातून सन २०१४ ते २०१६ या कालावधीत अंतिम विभागीय चौकशीच्या फाईल गहाळ प्रकरण, अतिक्रमण विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या मालाची / वस्तुची नोंद अतिक्रमण विभागात आढळून येत नसलेबाबत तक्रार हे प्रलंबित मुद्दे या पत्रात देण्यात आले आहे.