गोळीबार सारखा गुन्हा करतांना गुन्हेगारांना भीतीच वाटत नाही !

0

लोकशाही संपादकीय लेख 

अलीकडे भांडणात गोळीबार करणे गुन्हेगारांच्या हातचा मळ झाला आहे. जळगाव जिल्ह्यात वाळूच्या वादातून वाळू माफीयांचा एकमेकांवर गोळीबार करून वचपा काढण्याच्या घटना होत असल्याचे आपण पाहतो. नुकताच झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर तालुक्यातील एका उमेदवाराच्या प्रचार रॅलीवर गोळीबार करून जुन्या वादाचा वचपा काढला गेला. जळगाव शहर आणि जिल्ह्याला झाले तरी काय ? असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा अथवा कायद्याचा धाकच राहिलेला नाही, असे म्हणावे काय ? गुरुवार दिनांक 24 एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील मध्यवस्तीत उच्चभ्रू रहिवास असलेल्या मीनाताई ठाकरे मार्केट परिसरात जुन्या वादातून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये पिंप्राळा हुडको येथील दादू उर्फ महेंद्र समाधान सपकाळे या 22 वर्षीय तरुणावर गोळी चालवण्यात आली. ती गोळी महेंद्र सपकाळ यांच्या उजव्या कमरेच्या खाली लागल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला.

गोळीबार करणारे विशाल कोळी आणि त्याचा साथीदार गोळीबार करून तेथून पसार झाले. घटनेचे वृत्त कळताच रामानंद पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी तेथे पोहोचले. संबंधित आरोपीचे नाव निष्पन्न झाले असले तरी आरोपी मात्र अद्याप फरार आहे. गोळीबाराच्या घटने संदर्भात गुन्हा दाखल करून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान जखमी महेंद्र सपकाळ याला सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. तथापि जखमी गंभीर असल्याने जखमी महेंद्र सपकाळ याला खाजगी रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रामनवमीच्या आधी झालेल्या एका जुन्या वादातून हा गोळीबार ही गोळीबाराची घटना घडली असून आरोपी आणि फिर्यादी हे दोन्ही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. याचा अर्थ दोन गटात झालेल्या भांडणात आरोपी फिर्यादी गुन्हेगार प्रवृत्तीचे असणारच. कारण अशा छोट्या छोट्या वादातून एकमेकांवर गोळी बार करण्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचा फार मोठा हात असतो. सर्वसामान्य लोकांमध्ये बंदुकीतून गोळी गोळीबार करण्याची हिम्मत होऊच शकत नाही.

अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दोन्ही गटातील लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे नवीन काय सांगितले ? या दोन्ही या गुन्हेगार प्रवृत्तीकडे बंदुकी येतात कुठून ? त्यांना जर बंदुकीचा परवानाच दिला गेला असेल तर अशा गुंड प्रवृत्तीच्या बंदुकीचा परवाना दिला का गेला? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर बिगर परवाना धरी बंदूक हे वापरत असतील, तर त्या बिगर परवानांच्या बंदुका जळगाव जिल्ह्यात येता कुठून? हा खरा प्रश्न आहे. बिगर परवाना बंदुका शोधण्याचे काम पोलिसांचे नाही काय? बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातून बीड जिल्ह्यात खिरापती सारख्या बंदुकीचे परवाने वाटण्यात आल्याचे उघडकीस आले होते. याचा परिणाम बीड जिल्ह्यातील प्रत्येक तरुण कमरेला बंदूक लावून दहशत निर्माण करत होता.

जमावावर दहशत निर्माण करण्यासाठी बंदुकीच्या हवेत फेरी झाडल्या जात होत्या. अशा बेकायदा शस्त्र साठ्याला वेळीच आळा घातला गेला नाही, तर जळगाव जिल्ह्याचे बीड वाहिला वेळ लागणार नाही. त्यामुळे दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गटांमध्ये होणाऱ्या भांडणात गोळीबार होत असेल तर या घटनेने पोलिसांकडून गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. अन्यथा गुन्हेगारी गुन्हेगारांची हिंमत वाढल्याशिवाय राहणार नाही. सर्वप्रथम अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना ठेचून काढण्याची कारवाई पोलिसांकडून झाली पाहिजे. गोळीबार करून फरार झालेल्या विशाल कोळीला तातडीने अटक करून त्याच्या साथीदारावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावर जर कडक कायद्याची कारवाई केली तर जिल्ह्यात येणाऱ्या बिगर परवाना बंदुकींचा शोध लागण्यास वेळ लागणार नाही. तसेच गुन्हेगारांना ठेचून काढण्यासाठी त्यांच्यावर हद्दपारी सारखी कारवाई केल्यास जिल्ह्यात शांतता नांदेल, एवढे मात्र निश्चित.. पाहूया पोलीस कशी कारवाई करतात ते..!

Leave A Reply

Your email address will not be published.