जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांच्या सोयीसाठी पाच नवीन पर्यटक गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या सहाय्याने 27 किलोमीटर परिसरातील वाघ, बिबट, अस्वल आणि अन्य वन्यजीवांचे दर्शन घेता येणार आहे. या नवीन उपक्रमामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, 12 स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या गाड्यांचे व्यवस्थापन स्थानिक वन व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले आहे, ज्यामुळे पर्यावरणीय संवेदनशीलतेचा विचार केला जाणार आहे.
पोलीस दलाचे आधुनिकीकरण
जिल्ह्यातील पोलीस दलासाठी 63 दुचाकी वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वाहनांचा उपयोग आपले पोलीस संकल्पना, डायल 112 आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि बीट पेट्रोलिंगसाठी होणार आहे. या वाहनांमुळे पोलीस दलाची गती, प्रतिसाद क्षमता आणि कार्यक्षमता वाढणार आहे. या दोन्ही उपक्रमांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित उपस्थित होते.
वन्यजीव संवर्धन आणि पोलीस दलाचे आधुनिकीकरण या उद्दिष्टांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. पर्यटन आणि सुरक्षा क्षेत्रात नवा अध्याय या लोकार्पणामुळे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन आणि सुरक्षेच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे.