जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून अनेक रेल्वे अपघात घडत आहेत. त्यातच जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना टळली आहे. जळगाव जिल्ह्यातील म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे रुळांवर आणि रुळांच्या मधोमध दगड ठेवण्यात आले होते. ही संपूर्ण घटना वेळेत लक्षात आल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून रेल्वे प्रशासनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. ही दुर्घटना रेल्वे कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि तत्परता यामुळे टळली आहे.
म्हसावद स्थानक परिसरात रेल्वे कर्मचाऱ्यांनी दररोजच्या तपासणीदरम्यान रुळांवर दगड आढळल्याचे लक्षात घेतले. हे दगड केवळ रुळांच्या बाजूला नव्हते, तर थेट दोन रुळांमध्ये अडकवले गेले होते. हे पाहताच कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. रेल्वेच्या यंत्रणांनी तत्काळ या भागातील संपूर्ण रुळांची तपासणी करून दगड हटवले आणि अपघात टाळण्यात यश मिळवलं.