शेतकऱ्याच्या कुटूंबाला सुरक्षा देणारी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पुर, सर्पदंश, विंचुदंश, विजेचा शॉक बसणे, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे अनेकदा शेतक-याचा मृत्यु ओढवतो किंवा काहीना अंपगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थीती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतक-यास/त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेल्या शेतक-यांच्या कोणत्याही एक सदस्य आई, वडील, शेतकरीची पती, पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांपैकी कोणतीही एक असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकुण २ जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही योजना १९ एप्रिल, २०२३ पासून आवश्यकतेनुसार प्रथम ३ वर्षे राबविण्यात येणार आहे. अशी माहिती संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एक सदस्यांमध्ये आई वडील, शेतकरीची पती पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. कृषि गणनेनुसार निर्धारीत केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले शेतक-याच्या कुटुंबातील कोणत्याही १ सदस्य असे एकुण २ व्यक्तींकरिता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. अपघाती मृत्यु झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 2 लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा किंवा एक हात अथवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये अनुज्ञेय असतील.

रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडुन मृत्यु, जंतुनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडुन मृत्यु, खुन, उंचावरुन पडुन झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलवाद्यांकडुन झालेली हत्या, जनाव-यांच्या हल्यामुळे/चावण्यामुळे जखमी/मृत्यु, बाळांतपणातील मृत्यु, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा समावेश असेल. नैसर्गिक मृत्यु, विमा कालावधीपुर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असतांना झालेला अपघात, भ्रमिष्ठपना, शरिरातंर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युध्द, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खुन या बाबींचा समावेश नाही.

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे – ७/१२ उतारा, मृत्युचा दाखला, शेतक-यांचे वारस म्हणुन गावकामगार तलाठयाकडील गांव नमुना नं. ६ क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. वारसदाराचे ओळखपत्र आधारकार्ड/पॅनकार्ड/बँक पासबुक/निवडणुक ओळखपत्र, अपघातग्रस्ताचा वयाचा दाखला, जन्मदाखला/शाळा सोडल्याचा दाखला/ शाळेच्या मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र/ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र/आधार कार्ड/पॅन कार्ड/वाहन चालविण्याचा परवाना/पारपत्र/निवडणुक ओळखपत्र यापैकी कोणतेही एक कागदपत्र., प्रथम माहिती अहवाल/घटनास्थळ पंचनामा/पोलिसपाटील माहिती अहवाल., अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे आवश्यक आहे.

जेव्हा शेतक-याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/शेतक-यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसाच्या आत सादर करावा. यासाठी कृषि विभागाच्या सर्व क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावे. वारसदाराची निवड पध्दत- अपघातग्रस्ताची पत्नी/अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी, अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून, अन्य कायदेशीर वारसदार आदि प्रमाणे निवड करण्यात येईल. असे श्री. ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.