उच्चतंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग… शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शेतकऱ्यांनी उच्च कृषीतंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्या जोडीला त्यांचे अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अशाश्वत शेतीला शाश्वत करण्याची किमया शेतकऱ्यांनी करून दाखविली आहे. त्याबाबतचा खडतर परंतु तितकाच प्रेरणादायी प्रवास शेतकऱ्यांनी उलगडून दाखविला. फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्स येथे प्रगतशील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. त्यात अत्यंत प्रेरक व मोलाचे विचार शेतकऱ्यांच्या संवादातून मिळाले.

फालीच्या पहिल्या टप्प्यातील विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कृषिसंबंधीत विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. कृषितज्ज्ञांशी संवाद साधला. भविष्यातील शेतीविषयी अनेक बाबी जाणून घेतल्या. दिवसभरात विद्यार्थ्यांनी गांधीतीर्थसह अत्याधुनिक पद्धतीने फळबागेची लागवड कशी केली जाते, याबाबत प्रत्यक्ष शेतात जाऊन सघन लागवड पद्धतीत आंबा व संत्रा उत्पादनाचे प्रात्यक्षिक बघितले. शेतकन्यांशी संवाद साधला. शिवारफेरीतून टिश्यूकल्चर तंत्रज्ञान समजून घेतले. संशोधनाच्या दृष्टीने जैन इरिगेशनच्या आर ॲण्ड डी लॅबमधील तज्ज्ञांशी संवाद साधला. सोलर पार्क, टिश्युकल्चर भविष्यातील शेतीचे प्रयोग, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, सिंचन प्रकल्प यासह जैन इरिगेशनचे कृषितंत्रज्ञान समजून घेतले.

जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानातून गवसला शेती समृद्धीचा मार्ग

जळगावच्या जवळच असलेल्या करंज येथील प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी अनिल जिवराम सपकाळे यांनी आपल्या शेतीचा अनुभव सांगितला. १९९३ पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करत असू त्यावेळी आमची जेमतेम परिस्थिती होती. टिश्युकल्चर रोपे लावण्याआधी केळीचे खोड लावत असू, मोकाट पद्धतीने सिंचन करत होतो. त्यावेळी केळी काढणीस १५ ते १६ महिने लागायचे. टिश्युकल्चर केळी रोपांची लागवड केल्यावर केवळ ११ महिन्यात अत्यंत गुणवत्तेची, एक्सपोर्ट क्वालिटी केळी पिकवू लागलो. केळीची निर्यात केली आहे. स्वतः बरोबर गावाची देखील प्रगती साध्य केली. आमचे एकत्र कुटुंब असून कुटुंबाची १३ हेक्टर तर माझ्या वाट्याला २ हेक्टर ७२ आर इतकी शेती आहे. चार वर्षांपूर्वी आम्ही ५० शेतकरी मिळून गट स्थापन केला आणि बेबीकॉर्नची शेती केली होती ती यशस्वी करून दाखविली.

अथक परिश्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे गुणवत्तापूर्ण शेतमालाचे उत्पादन करू केळी सोबत गहू, हरबरा, तूर पिके घेत असतो. सपकाळे हे शेतीमध्ये विविध प्रयोग अव्याहत करतात.  २०२२ मध्ये राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते शासनाच्या कृषी विभागाचा कृषीभूषण पुरस्काराने गौरव झाला. याच सोबत रितेश परदेशी (कोचूर ता. रावेर), जयंत सुभाष पाटील (फैजपूर ता.यावल), संदीप पाटील, बापू खंडू पाटील (जळके,ता.जळगाव) उमेश गोपाळ महाजन (हिवरखेडे ता. जामनेर) यांनी आपल्या शेती आणि शेतीतील विविध प्रयोगांची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

याच कार्यक्रमात ज्या कंपन्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले आहे अशा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील फाली विद्यार्थ्यांचा मुक्तपणे संवाद झाला. यात गोदरेज अॅग्रोव्हॅटचे वरिष्ठ अधिकारी डॉ. आर. एस. मसळी, युपीएल कंपनीचे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश विभागाचे प्रमुख अमोल कदम, जीसीएमएमपीचे अजय सेठ, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, वरिष्ठ अधिकारी डॉ. बालकृष्ण यादव, आंतराष्ट्रीय कृषीतज्ज्ञ डॉ. पी. सोमण, रॅलीज इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी रवींद्र पाटील, महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे आशिष गणपुळे, सुरज पानपत्ते, एचडीएफसी बँक कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी बळवंत धोंगडे यांचा सहभाग होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकरी व अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फालीच्या व्यवस्थापिका रोहिणी घाटगे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.