फालीच्या माध्यमातून शेतीला प्रतिष्ठा – अतुल जैन

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

शेत, शेतकरी यांच्या जीवनात विज्ञानाच्या मदतीने उत्पन्न वाढीच्या दृष्टिने जैन इरिगेशनसह इतर कृषिपुरक कंपन्या प्रयत्न करत आहेत. मात्र सामाजीक, राजकीय, शासकीय सर्वच स्तरावर सामाजिक प्रश्न जो गांभीर्य धरत आहे तो म्हणजे शेत, शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळत नाही. ही प्रतिष्ठा फालीसारख्या उपक्रमातून मिळू पहात आहे. समाजाकडून जे घेतले त्यातून उतराई होण्याचा फाली हा उपक्रम कौतूकास्पद असल्याचे प्रतिपादन जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांनी केले.

जैन हिल्स येथे सुरू असलेल्या फाली च्या नवव्या संमेलनाच्या समारोपाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत अतुल जैन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी यांच्यासह ज्यांनी प्रायोजकत्व केले त्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुत्रसंचालन हर्ष नौटियाल, रोहिणी घाडगे यांनी केले. आभार नॅन्सी बॅरी यांनी मानले त्यात त्यांनी फाली ई कोर्सची संकल्पना राजस्थान येथून सुरू करत असल्याचे सांगितले. याची जबाबदारी सौ. अंबिका अथांग जैन यांनी घेतलेली असल्याचे जाहिर केले. रूचिता तोटे, क्षितीजा कुंभार, गुंजन चौधरी, सुप्रिया जिते या फालीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यासोबतच माजी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. कंपनी प्रतिनिधींच्या वतीने डॉ. जयंत उमरे, मयूर राजवाडे, सौरभ घोषरॉय, आशिष शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरात संवाद साधला. यात जैन इरिगेशनच्या प्रेरणादायी प्रवासाची गोष्टी स्वरूपात माहिती दिली. शेती समोर असलेली आव्हाने दूर करत  असताना सामाजिक दृष्टीने संवेदनशील पणे बघणे गरजेचे आहे. शेती समाजात पत, प्रतिष्ठा मिळावी. फाली हा विद्यार्थ्यांसह शेतीमधील भविष्यदर्शी नेतृत्व निर्माण करण्याचा यज्ञ आहे.  आम्ही भारतीय म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे की हा यज्ञ अव्याहतपणे सुरू ठेवावा. कारण शेती हाच जगातील कुठल्याही देशाचा प्रगतीचा मार्ग आहे. शेती हिच संस्कृती असून तेच जीवन आहे. भविष्यात शेत, शेतकरी यांची कास सोडू नका अशी साद अतुल जैन यांनी उपस्थितांना घातली.

जैन हिल्सच्या आकाश मैदानावर विद्यार्थ्यांनी ३१ इन्होव्हेशन व बिझनेस प्लॅन सादर केले. यात बायोडिझेल फॉर्म, स्पिरुलिना शेती, बांबु शेती व त्याची उत्पादने, मल्टी व्हिटामिन पावडर, मल्टि पर्पज फ्रूट एन्झाईम, आवळा शेती आणि त्याची अन्य उत्पादने, आयुर्वेदीय शेती, केळीचा खजिना, मधमाशी पालनातून मधाचे संकलन’ कापड निर्मिती, एकात्मिक शेती, चिया सिड फार्मिंग, नारळाच्या करवंटीपासून शोभेच्या वस्तू, मिरची पावडर व लोणचे, भरघोस वाढीसाठी ॲमिनो ॲसिड, काॕकनट फॕक्टरी, शेवगाची पानं, सेंद्रिय गुळ पेढा, धुप अगरबत्ती उत्पादन,  मनुका तयार करणे, कढिपत्याची चटणी व अन्य उत्पादने, बिट उत्पादन व अन्य उत्पादने,  तृणधान्यापासून कुरकुरे, भाजी व फळं निर्जिलीकरण, गोसबेरी प्रोडक्टर अशी भन्नाट कल्पना असलेले मॉडेल प्रभावीपणे सादर केले.

परिक्षक म्हणून यांनी काम पाहिले

परिक्षक म्हणून जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, डॉ.जयंत उमरे, रवी सिंग (गोदरेज ॲग्रोवेट), डॉ. शविंदर कुमार (महिंद्रा),  सौरभ घोषरॉय, पराग सबनिस (स्टार ॲग्री), आशिष शेंडे (रॕलिज इंडिया), मयूर राजवाडे, अविनाश ठाकरे (यूपीएल), राजन शर्मा (एचडीएफसी बँक),  एम. के. डे (नाबार्ड), यादेराव पडोळे (समुन्नती) उपस्थित होते.

बिझनेस प्लॅन सादरीकरण स्पर्धेतील विजेते

हर्ब रिच बनाना, नवमहाराष्ट्र विद्यालय पांढरे, जि. पुणे (प्रथम), कर्मवीर फिंगर क्रंची स्नॅक्स, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे जि.सांगली (द्वितीय), ब्रुम ग्रास फार्मिंग ॲण्ड ब्रुम प्रॉडक्शन वसंतराव नाईक हायस्कूल जरूड जि. अमरावती (तृतीय), जादुई पेरू सोमेश्वर विद्यालय, अंजनगाव जि. पुणे (चतुर्थ), सेंद्रिय गुळ पेढा श्री. निगमानंद विद्यालय, तळणेवाडी जि. बीड (पाचवा) क्रमांकाने विजयी झाले.

इन्होव्हेशन स्पर्धेतील विजेते

द्राक्ष फवारणी मॉडेल, न्यू इंग्लिश स्कूल रिधोरे जि. सोलापूर (प्रथम), स्मार्ट इरिगेशन सिस्टीम्स, प्रभात हायस्कूल पुसला जि. अमरावती (द्वितीय),  ट्रान्सप्लान्टींग मशिन, श्री. संत मुक्ताबाई विद्यालय शेलगाव जि. पुणे (तृतिय), न्यू फार्मिंग सिक्युरिटी, न्यू इंग्लिश गर्ल स्कूल मलकापूरर जि. बुलढाणा (चतुर्थ), कर्मवीर चाळणी यंत्र, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा (पाचवा) हे विजेते ठरले.

फाली उपक्रमाची वैशिष्ट्ये

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एकूण ८७ ॲग्रिकल्चर एज्युकेटर असुन त्यापैकी ५४ एमएस्सी ॲग्री व ३३ बिएस ॲग्री पदवीधर आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि आता मध्यप्रदेश मधील १८० ग्रामीण शाळेतील १५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग. फालीचा शिक्षणाचा विद्यार्थ्यांसह पालकांचा शेती व्यवसायात चपखल वापर होत आहे. यातील बहुतांशी विद्यार्थी (सुमारे ५४ टक्के) शेती क्षेत्रात भवितव्य घडविणार. फालीच्या प्रायोजक कंपन्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, व्यवसायासाठी बिज भांडवल, कामाच्या अनुभवासाठी इंटर्नशिप व सर्वतोपरी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.