व्हायरस फ्री, निरोगी रोपांमुळेच उत्तम फळधारणा – इस्त्राईलचे राजदूत यअर ईशेल

0

जैन हिल्सच्या अभ्यास दौऱ्याप्रसंगी मधुमक्षिका पालनावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जैन इरिगेशनच्या फळलागवड पद्धतीच्या सघन, अतिसघन लागवड तंत्रामुळे झाडांची संख्या वाढली. उत्पादनही वाढत आहे. मात्र चांगल्या दर्जाचे उत्पादन घेण्यासाठी खात्रीशील नियंत्रीत वातावरणातील मातृवृक्षापासून तयार झालेली व्हायरस फ्री, रोगमुक्त रोप व कलमांची लागवड शेतकऱ्यांनी करावी. यासाठी चांगल्या नर्सरीतून रोपांची निवड करणे महत्त्वाचे आहे. एक सारखी रोपांची वाढ झाली तर फुलोरा अवस्थाही एक समान होऊन मधुमक्षिका ह्यांना परागिभवनाचे कार्य व्यवस्थीत करता येते. यातून फळधारणाही उत्तम होऊन निर्यातक्षम फळांचे उत्पादन होते. यासाठी मधुमक्षिका पालनाकडेही शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे; असे आवाहन हॉर्टिकल्चर व लसूण तज्ज्ञ आणि इस्त्राईलचे भारतातील राजदूत यअर ईशेल (Yair Eshel) यांनी केले.

जैन हिल्सच्या अभ्यास दौऱ्यात देशभरातील शेतकरी, कृषी अभ्यासक, विद्यार्थी भेट देत आहेत. आज फळबाग लागवड आणि उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिकांची भूमिका यावर इस्त्राईलचे यअर ईशेल (Yair Eshel) यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, संजय सोन्नजे, अभिनव अहिरे, बी. डी. जळे, विकास बोरले, मिलींद पाटील, गोविंद पाटील उपस्थित होते.

जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर आंबा, केळी, भगवा डाळिंब, पेरू, मोसंबी, संत्रा, सिताफळ, चिकू यासह विविध फळबाग लागवड करण्यात आली आहे. विविध प्रकारची हळद आणि आले (अद्रक) लागवड आहे. देशभरातील नामवंत कांद्याचे वाण असलेल्या ८२ च्या वर कांद्याची लागवड केली आहे. यात कांद्याच्या सीड साठी उपयुक्त असलेले मधुमक्षिकांचे परागिभवन यावर प्रात्यक्षिकांसह यअर ईशेल (Yair Eshel) यांनी मार्गदर्शन केले. कुठंलेही उत्पादन वाढीमध्ये मधुमक्षिकांचे योगदान खूप मोलाचे असते. यासाठी सुरवातीलाच चांगल्या रोपांची उत्तम नर्सरीतून निवड केली पाहिजे. त्यामुळे रोपांची एक समान वाढ होऊन उत्पादन वाढते परागीभवन करताना मधुमक्षिकांनाही अडचण येत नाही. यात एपिस मॅलिफेरा या जातीची मधमाशी महत्त्वाची आहे. एक किलोमिटर परिसरात ती काम करते. चांगल्या फळधारणेसह कांद्याच्या सीड चे उत्पादन वाढीमध्ये मधुमक्षिकांचे पालन महत्त्वाचे ठरते. शिवाय ५० किलोच्या मधुमक्षिकाच्या पेटीतून वर्षाला सुमारे ५० किलो मध ही उपलब्ध होऊ शकते. यातून शेतकऱ्यांचा मधुमक्षिपालनाचा खर्च निघतो. आणि शेतात जेसुद्धा फुलोरा येणारी जी पिके आहेत त्यांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन होते. यावेळी त्यांनी जैन फार्मफ्रेश फूड प्रक्रिया उद्योगालाही भेट देऊन कांदा, लसुण यासह मसाल्यांवर होणारी प्रक्रिया समजून घेतली. नियंत्रीत वातावरणात असलेली मातृवृक्षापासून रोगविरहीत, व्हायरस फ्री रोपांची निर्मिती कशी होते यासाठी टिश्यूकल्चर विभागाचीही त्यांनी पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.