पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपामध्ये ताणतणाव दिसून येत आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. नुकतीच पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाज स्वप्निल कुसाळेने देशासाठी ब्रॉझ मेडल जिंकलं आणि त्याच्या नागरी सत्काराच्या निमित्ताने या अंतर्गत गटबाजीचा पर्दाफाश झाला. अमोल बालवडकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून चंद्रकांत पाटील हजर राहले नाहीत. अमोल बालवडकर यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून त्यामुळे पाटील आणि बालवडकर यांच्यात तणाव उफाळून आले आहे. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पुण्यात भाजपातल्या या संघर्षाचे दृश्य उघड झाले आहे.
पुण्यातील भाजपचे आमदार तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क कोल्हापूरचे सुपुत्र आणि देशाची मान उंचवणारा स्वप्निल कुसळेच्या नागरी सत्काराकडे पाठ फिरवली. बालेवाडीमध्ये होणाऱ्या एका दहीहंडी उत्सवाला चंद्रकांत पाटील जाणार नसल्याचं त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे बालेवाडीतील या दहीहंडी उत्सवाला भारताचा आघाडीचा नेमबाज स्वप्निल कुसळे येणार आहे. समस्त बालेवाडीतील ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारलेला तब्बल पाच लाखांचा धनादेश चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुसळे यांना सन्मानित केलं जाणार होतं.
मात्र आता चंद्रकांत पाटील या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याने बालेवाडी भागातील ग्रामस्थांचा मोठा हिरमोड झाल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान संबंधित दहीहंडी उत्सवाच्या आयोजन करणाऱ्या अमोल बालवडकर यांना चंद्रकांत पाटील यांना कार्यक्रमाबद्दल आमंत्रण दिले गेले नव्हते का? असे विचारला असता त्यांनी आपण नम्रपणे निमंत्रण दिल्याचं सांगितलं.
चंद्रकांत पाटील यांना स्वप्निल कुसळे यांच्या सत्काराबद्दलची पूर्ण कल्पना दिल्याची माहिती सुद्धा दिली. चंद्रकांत पाटील आपल्या कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर एका दहीहंडी उत्सवाला येणार आहेत अनावधानाने त्यांच्याकडून कार्यक्रम पत्रिकेत आपल्या कार्यक्रमातील उपस्थितीबद्दल लिहायचे राहून गेले असेल. मी त्यांना पुन्हा विनंती करेन. ग्रामस्थांची निराशा होऊ देणार नसल्याचं बालवडकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान केवळ चंद्रकांत पाटील यांना आव्हान देत अमोल बालवडकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरू केल्यानेच चंद्रकांत पाटील त्यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.