अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अंगणातून रिक्षा गेली म्हणून तिघांनी एकाला डोक्यात वीट मारून जखमी आणि त्याच्या पत्नीलाही मारहाण केल्याची घटना १२ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पातोंडा येथे घडली.
शांताराम भालेराव पाटील रा. पातोंडा हे १२ रोजी सायंकाळी त्यांची रिक्षा मधुकर राजराम पाटील यांच्या अंगणातून नेताना मधुकर पाटील यांनी अंगणात टाकलेल्या मातीच्या वरमावरून गेल्याने मधुकर पाटील शिवीगाळ करू लागले. लगेच सिंधुबाई राजाराम पाटील या देखील बाहेर आल्या त्यांनीही शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. शांताराम पाटील यांची पत्नी वर्षा भांडण सोडवायला गेली असता तिलाही मारहाण सुरू केली.
दरम्यान भोलू मधुकर पाटील याने हातात वीट घेऊन शांताराम पाटील यांच्या डोक्यात मारली. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दोन टाके टाकून धुळ्याला पाठवण्यात आले.
दवाखान्यातून परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला मधुकर पाटील, सिंधुबाई पाटील, भोलू पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५, ३५१ (२), ३५२, ३ (५) गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.