इंदोर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शहरातील पटेल नगरातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात असलेल्या विहिरीचे छत अचानक कोसळले. यावेळी त्या छतावर उभे असलेले 25-30 लोक विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 19 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राम नवमीमुळे मंदिरात भाविकांची गर्दी होती. मंदिरात एक विहीर आहे, ज्यावर छत टाकण्यात आले होते. यावेळी अनेकजण या विहिरीच्या छतावर उभे होते. यावेळी अचानक हे छत कोसळले आणि त्यावर उभे असलेले लोक विहिरीत पडले. विहिरीत पडलेल्यांमध्ये महिला आणि मुलींचाही समावेश आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्य सुरू केले, तसेच प्रशासनाचे बचाव पथकही दाखल झाले.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी ट्विट करुन या घटनेवर दुःख व्यक्त केले. तसेच, या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच, जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जातील असेही त्यांनी सांगितले आहे.