लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑपरेशन टायगर नंतर फुटलेल्या सहा खासदारांवरून सध्या राजकारण चांगलेच तापलेले दिसून येत असून दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. अश्यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. उद्धव ठाकरे आगामी काळात पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याचा उद्देश संघटनात्मक आढावा घेणं, स्थानिक परिस्थिती समजून घेणं आणि शिवसैनिकांशी थेट संवाद साधणं असल्याचं राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
संजय राऊत यांच्या सांगितलं की, उद्धव ठाकरे तीन दिवसांत पाच लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रत्येक ठिकाणी जाऊन स्थानिक राजकीय स्थितीचा सखोल आढावा घेणार आहेत तसंच पक्ष संघटनेची ताकद तपासणार आहेत. या भेटींमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांशी थेट संवाद साधला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितले. ज्या मतदारसंघांमध्ये काही खासदारांवर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचं आरोप आहेत त्या ठिकाणी अजूनही शिवसेनेची संघटनात्मक ताकद मजबूत असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या भागात संबंधित खासदारांसोबत एकही शिवसैनिक गेलेला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची निष्ठा अबाधित असल्याचं चित्र दिसतं.
पक्षफुटीच्या मुद्द्यावर भाष्य करताना राऊत यांनी आमदारांच्या संख्येचा उल्लेख करत कठोर भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, १२ असोत किंवा २२ आमदार, पक्षविरोधी हालचाली करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. पक्ष फोडण्याचे प्रयत्न पूर्वीही झाले असून ते अजूनही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडींना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून उत्तर दिलं जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा राजकीय हालचाली आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचेही राऊत यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राऊत यांनी तीव्र टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार भविष्यात शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाही राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू शकतात. कारण ते त्यांना ही फोडण्याचा प्रयत्न करू शकतात. तसंच पुढे अमित शहा यांच्याविरोधातही काही राजकीय हालचाली होऊ शकतात, असं विधान त्यांनी केलंय.


