नवी दिल्ली: कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे.दरम्यान, देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE board) बोर्डाने अखेर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्ध झाली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या दोन्ही बोर्डांच्या पावलावर पाऊल ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात परीक्षेशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं अशक्य, असल्याचं मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी व्यक्त केलं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेणं उचित शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांच मतं आहे.
सीबीएसई विद्यार्थ्यांची देशातील एकूण संख्या 19 लाख आहे. तर, एकट्या महाराष्ट्रातील एसएससीची विद्यार्थी संख्या 16 लाख आहे. याशिवाय बारावीची विद्यार्थी संख्या देखील वेगळी आहे. त्यामुळे परीक्षेविना विद्यार्थ्यांना पास करणं अशक्य आहे.
तेलंगणा सरकारने कोविड -19 प्रकरणातील वाढ पाहता इंटरमीडिएट प्रथम वर्ष (इयत्ता ११ वी) च्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील वर्गात प्रमोट करण्याचा आणि दहावीची वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. विशेष मुख्य सचिव चित्रा रामचंद्रन म्हणाले, राज्यातील सध्याची साथीची परिस्थिती आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.


