
लोकशाही संपादकीय लेख
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे तेजस गजानन महाजन या 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा गळा चिरून खून करून त्याचा मृतदेह गावानजीच्या पडीक शेतातील काटेरी झुडपात फेकून देण्यात आला होता. सोमवार दिनांक 26 जून रोजी रिंगणगावला बाजाराचा दिवस होता. संध्याकाळी या तेजस महाजन बालकाचा खून करून शेतातील काटेरी झुडपात त्याचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. तेजस रात्री घरी आला नसल्याने त्याचे वडील गजानन महाजन यांनी पोलिसात फिर्याद दिली. मंगळवार दिनांक 17 जून रोजी सकाळी तेजसचा मृतदेह काटेरी धुडपात आढळून आला. तेजसच्या मृत्यूची योग्य चौकशी होऊन आरोपीला अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा हट्ट रिंगणगावच्या गावकऱ्यांनी केला. त्यासाठी महामार्गावरील रिंगणगावच्या गावकऱ्यांनी रास्ता रोको केला. तथापि पोलिसांच्या आश्वासनानंतर तेजसचा मृतदेह ताब्यात घेऊन सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी पोलिसांनी दोन आरोपींना पकडून अटक केली. आरोपींनी गुन्हा कबूलही केला. तेजसचा आम्हाला धक्का लागल्याने आम्ही त्याला मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला, असा आरोपींनी जबाब दिला. परंतु एका लहान बालकाचा धक्का लागला म्हणून त्यांची मजल खून करण्यापर्यंत जाते हा सर्वसामान्यांना सुद्धा न समजणारा प्रकार होता. यामागे वेगळाच वास येतोय, असा संशय गावकऱ्यांच्या मनात असून, हा खून नसून वेगळाच अघोरी प्रकार आरोपींनी केला आहे, अशी चर्चा गावभर सुरू झाली. परंतु पोलीस ‘तो खुनाचा अघोरी प्रकार असावा’ या चौकशीपर्यंत पोहोचलेच नाहीत. धक्का लागला म्हणून मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असता तर त्याचे अंगावर मराठीचे खुणा दिसल्या असत्या. धक्का लागला म्हणून त्याचा गळा चिरण्यापर्यंत मजल मारली जाते, याचा अर्थ आरोपींनी तो अघोरी खुनाचा प्रकार केला असावा, असा दाट संशय रिंगणगावच्या गावकऱ्यांना आला.
असा प्रकार पुन्हा व्हायला नको, अशा प्रकारची भीती रिंगणगाव गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. या खून प्रकरणाची कसून चौकशी करावी या मागणीसाठी जळगाव या जिल्ह्याच्या ठिकाणी शिवाजी चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. खासदार स्मिता वाघ यांना मोर्चेकर्यांनी धारेवर धरले. त्यांना सळो की पळो करून सोडले. त्याचे पडसाद जिल्हाभर उमटले आणि विधानसभेच्या अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहात माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी आवाज उठवला. कारण मोर्चाद्वारे जे निवेदन देण्यात आले होते त्यात हा ‘नरबळीचा प्रकार’ असल्याचा उल्लेख करण्यात आला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अद्याप नरबळीसारखे प्रकार होत असतील तर ही गंभीर बाब आहे. रिंगणगावचे गावकरी म्हणतात हा नरबळीचा प्रकार आहे. त्यामुळे रिंगण गावात तसेच परिसरातील गावांमध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले बाहेर गेली, अथवा शाळेला गेली, तर ती परत येतील की नाही? ही एक प्रकारची मनात भीती निर्माण झाली आहे. याचा तपास एलसीबीकडे देण्यात आला आहे. परंतु महाराष्ट्राच्या दृष्टीने हा गंभीर प्रकार असून त्याची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेत एकनाथ खडसे यांनी सभापती महोदयांकडे केली. त्या सभापतींनी शासनाने या संदर्भात निवेदन करण्याची सूचना केली आहे.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात नरबळीसारखे प्रकार होत असतील, तर ती बाब गंभीर आहे. या याप्रकरणी महाराष्ट्राच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनीही याची पाहणी करून त्याचा अभ्यास करीत आहेत. रिंगणगावच्या तेजस गजानन महाजन या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा गळा चिरला त्या ठिकाणी तांदळाचे दाणेही आढळून आले, असे सांगण्यात येते. तेव्हा याबाबतीत महाराष्ट्र शासनाच्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून योग्य तो खुलासा करावा. जेणेकरून सर्वसामान्यांच्या मनातील भीती दूर होईल. तसेच आरोपी हे अशिक्षित मजूर आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून इतर कोणी असे प्रकार करण्यास धजावणार नाही…!

