जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पातर्फे कृषिदिनानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम, सावखेडा येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रगतशील शेतकरी, उत्कृष्ट उद्योजक शेतकरी व गटांचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, महिला सशक्तीकरणाऱ्या दृष्टीने सीएसआर निधीमधून महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नीलकंठ गायकवाड, जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास पाटील, भगवान गोडसे, माजी पोलीस पाटील रघुनाथ पाटील, खुशाल गांधी, मनीषा खडके, शिवाजी भोईटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रमुख अनिल भोकरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी प्रकल्पाचे कार्य आणि कार्यक्रमाचा उद्देश विशद केले.
सतीश मदाणे म्हणाले की, जनता बँक ही सर्वसामान्यांना घेऊन चालणारी बँक आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी बँक नेहमीच प्रयत्नशील आहे. कारण शेतकऱ्याचा विकास झाला तर देशाचा विकास होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी बँक नेहमी प्रयत्न करत असते. त्याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांच्या शेतीपुरक व्यवसायाला बँक आर्थसहाय्य करते. त्यानुसार, शेतीपुरक व्यवसायासाठी गेल्या वष बँकेने शेतकऱ्यांना दुग्धसंपदा पीएमईजीपी अंतर्गत 8 कोटींचे कर्जरुपी सहाय्य केले आहे. आगामी काळात जास्तीत जास्त शेकतऱ्यांना शेती पुरक व्यवसायासाठी कर्ज देण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, जळगाव जनता बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांनी केले.
नीळकंठ गायकवाड म्हणाले की, हल्लीच्या या आधुनिक युगात उत्पादन म्हणजेच निर्माण करणे हे सोपे आहे, पण उत्पादन विकणे हे कौशल्य आहे. त्यामुळे शेकऱ्यांनी उत्पादनासह विक्रीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आपल्या मालाला चांगली बाजारपेठ, चांगला भाव कसा मिळेल याचा अभ्यास शेतकऱ्यांनी करावा. त्यासाठी केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पाची मदत घ्या. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आणि जळगाव जनता सहकारी बँकेच्या सहकार्यातून बँकेने गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दुग्धसंपदा पीएमईजीपी अंतर्गत 8 कोटींचे कर्ज दिले आहे. हे शेतकऱ्याच्या विकासाला हातभार लावणारे कार्य आहे.

यांचा झाला सत्कार
प्रगतशील शेतकरी सुनील सुपडू पाटील, प्रमोद पंढरी पाटील, नंदकिशोर प्रल्हाद पाटील, अमृतराज कैलास पाटील, रघुनाथ सखाराम पाटील, कविता रवींद्र पाटील, प्रवीण तुकाराम पाटील, गजानन रमेश तिडके, मुकेश वाल्मिक देशमुख, रामधन त्र्यंंबक पाटील, महेंद्र वासुदेव पाटील, शुभम उमाकांत पाटील, प्रदीप भावराव पाटील, राकेश मधुकर चौधरी, राहुल सिद्धार्थ गायकवाड, अमोल सुधाकर पाटील, विवेक दिनकर पाटील, यशवंत देशमुख, यशवंत राजाराम पाटील, दुग्धसंपदा अंतर्गत प्रीती वीरेंद्र पाटील, नंदलाल गोकुळ पाटील, केतन सुरेश पाटील, राहुल निवृत्ती बेलदार, तुषार रमेश चौधरी, महेश अरुण पाटील, समग्र कृषी व ग्रामीण विकास प्रकल्पाचे व्यवस्थापक आदित्य सूर्यकांत सावळे यांच्यासह भूमाता महिला शेतकरी गट, आधार शेतकरी गट, जिजाऊ महिला बचत गट नागन खुर्द यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

