१२ जूनपासून गोव्यात दशम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गोवा येथे गेल्या 10 वर्षापासून होणाऱ्या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ मुळे देशात हिंदु राष्ट्राची चर्चा प्रारंभ झाली. त्यानंतर हिंदु राष्ट्राचे ध्येय समोर ठेवून विविध क्षेत्रांत कार्य करणे प्रारंभ झाले. या दहाव्या अधिवेशनात हिंदु राष्ट्राची कार्यपद्धती रूजवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘हिंदु राष्ट्रात आदर्श राजव्यवहार कसा असावा ?” याविषयी दिशादर्शन करण्यासाठी यंदाच्या अधिवेशनामध्ये ‘हिंदू राष्ट्र संसदे’ चे वैशिष्ट्यपूर्ण आयोजन करण्यात आले आहे.

अधिवेशनातील तीन दिवस ‘हिंदु राष्ट्र संसद’ घेतली जाणार आहे. त्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि संवैधानिक मार्ग’, ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ आणि ‘हिंदू शैक्षणिक पोरणांचा अवलंब कसा करावा ?’ या विषयांवर मान्यवरांकडून विस्तृत चर्चा होणार आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी यंदा 12 ते 18 जून 2022 या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’ फोंडा, गोवा येथे दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात उत्तर महाराष्ट्रातील १२ संघटनांचे ३० हुन अधिक प्रतिनिधी आमंत्रित आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेस त्यांच्यासह समन्वयक सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे आणि हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तरसंपर्क प्रमुख मोहन तिवारी हे उपस्थित होते.

प्रशांत जुवेकर पुढे म्हणाले की, नुकतेच ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी समान नागरी कायद्याच्या आधारे शरीयतमध्ये हस्तक्षेप चालणार नाही. हिंदूंना मुसलमान आवडत नसतील, तर हिंदूनी भारत सोडून निघून जावे’, असे उघडपणे धमकावले आहे. मुसलमानांनी धमकावून काश्मीरमधून हिंदूंना बाहेर काढले, आता उर्वरित भारतातून बाहेर काढण्याची त्यांची ही धमकी आहे. एकीकडे ‘आम्ही पाकिस्तानात गेलो भारतातून नाही”, असे  अभिमानाने सांगायचे आणि दुसरीकडे भारतीय संविधानाच्या आधारे बनलेल्या कायद्यांना विरोध करण्यासाठी इस्लामची ढाल पुढे करायची, हे यापुढे चालणार नाही. मुसलमान पाकिस्तानात न जाता भारतात राहिले, हा त्यांनी भारतावर केलेला उपकार नाही ! आज पाकिस्तानात गेलेल्यांची स्थिती काय आहे, हे त्यांनी पहावे. भारतातील बहुसंख्य हिंदूंनी मुसलमानांना अल्पसंख्यांकांच्या विशेष सवलती देऊनही बंधुभाव जोपासला आहे. हे लक्षात घ्यावे. आताचा भारत गांधीगिरी करणारा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून स्वराज्यरक्षण करणारा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी सांगितले की, कोरोनामुळे गेली दोन वर्षे हे अधिवेशन प्रत्यक्ष होऊ शकले नाही. वर्ष 2020 मध्ये ‘ऑनलाईन’ अधिवेशन घेण्यात आले. या वर्षी प्रत्यक्ष अधिवेशन होत असल्यामुळे देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशांसह भारतातील 26 राज्यातील 350 हून अधिक हिंदु संघटनांच्या 1000 पेक्षा अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात प्रामुख्याने ‘काशी येथील ज्ञानवापी मशीद’, ‘मथुरा मुक्ती आंदोलन’, ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट’, ‘काश्मिरी हिंदूंचा नरसंहार’, ‘मशिदींवरील भोंग्यांचे ध्वनीप्रदूषण”, ‘हिजाब आंदोलन’, ‘हलाल सर्टिफिकेट एक आर्थिक जिहाद’, ‘हिंदूचे संरक्षण’, ‘मंदिर संस्कृती- इतिहास यांचे रक्षण’, ‘धर्मांतर’, ‘गड-किल्ल्यांवरील इस्लामी अतिक्रमणे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव म्हणाले की, केंद्र सरकार आणि काही राज्य सरकार यांमुळे राममंदिर निर्माण, लव्ह जिहाद आणि धर्मातर यांच्या विरोधातील कायदे लागू होणे आणि कलम 370 हटवणे आदींविषयी सकारात्मक कार्य झाले असले, तरी काशी-मथुरेसह हिंदूंच्या अनेक धार्मिक अन् ऐतिहासिक स्थळांची मुक्ती होणे बाकी आहे. ओवैसी ‘बाबरी घेतली; पण ज्ञानवापी मशीद घेऊ देणार नाही’, असे सांगत आहे. देशभर हिंदूच्या मिरवणुका तथा धार्मिक उत्सवांवर भीषण हल्ले होत आहेत. मिशनऱ्यांकडून बलपूर्वक होणाऱ्या धर्मांतरामुळे ‘लावण्या’सारख्या हिंदू मुलीला आत्महत्या करावी लागत आहे. काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाला ३२ वर्ष होऊनही काश्मिरी हिंदूच्या हत्या आजही थांबलेल्या नाहीत. एकूणच हिंदू सर्वत्र असुरक्षित आहे. त्यामुळे हिंदूनी संविधानिक अधिकारांसाठी संघटित होणे आवश्यक बनले आहे. हिंदूच्या व्यापक संघटनासाठी हे अधिवेशन दिशादर्शक ठरेल.

हिंदू राष्ट्र सेनेचे मोहन तिवारी म्हणाले कि, यापूर्वीच्या ४ अधिवेशनात सहभागी झाल्याने हिंदू राष्ट्राच्या कार्याची एक निश्चित दिशा मिळाली. दशम अधिवेशनात होणाऱ्या विषयांतून पुढे उत्तर महाराष्ट्र स्तरावर देखील गड किल्ले संवर्धन अभियान, मंदिर संस्कृती रक्षण अभियान तसेच लँन्ड जिहाद विरोधी अभियान राबवण्यात येईल. तसेच हिंदू संघटनाच्या दृष्टीने हिंदूंची उत्तर महाराष्ट्र स्तरावर अधिवेशनाचे आयोजनही एकत्रितपणे करण्यात येईल.

या अधिवेशनाला प्रामुख्याने ‘सीबीआय’ चे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव, काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र “हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’ चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे तेलंगाणा येथील आमदार आणि हिंदु शेर  म्हणून प्रख्यात असलेले टी. राजासिंह, हिंदुत्ववादी ‘सुदर्शन न्यूज चॅनल’चे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांसह भारतभारतातील हिंदुत्ववादी आणि अध्यात्मिक संघटनांचे शेकडो प्रतिनिधी उपस्थित राहतील.

उत्तर महाराष्ट्र विभागातून जळगाव येथील ज्येष्ठ विधिज्ञ सुशील अत्रे, सुप्रसिद्ध मंगळ ग्रह संस्थानचे जनसंपर्क प्रतिनिधी शरद कुलकर्णी, व्यावसायिक उमेश सोनार, धुळे येथील गोरक्षक  संजय शर्मा, प्रथितयश सनदी लेखापाल गोवर्धन मोदी, नंदुरबार येथील आदिवासी देवमोगरा शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्रकुमार गावित, सुदर्शन चॅनलचे नंदुरबार प्रतिनिधी केतन रघुवंशी यांसह अनेक हिंदुत्ववादी, अधिवक्ता, व्यावसायिक अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनाला आतापर्यंत देशभरातील 30 हून अधिक हिंदु संघटना, संप्रदाय, विद्यापिठे, अधिवक्ता संघटना, पत्रकार, उद्योजक आदींनी समर्थन पत्रे दिली आहेत. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org http://HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब चॅनल आणि @HindulagrutiOrg या ट्वीटर हॅण्डल द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.