
चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
विदर्भात आगामी तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा भारत सरकारच्या हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राकडून देण्यात आला आहे. विशेषत: ७ जुलै रोजी काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या सूचनेनुसार, ६ ते ८ जुलै दरम्यान विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याचवेळी अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, इथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३७ मिमी पाऊस नोंदला आहे, तर चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ३१.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. वाशीम, अमरावती आणि यवतमाळमध्ये तापमान २२ अंश सेल्सिअस इतके कमी आहे. पुढील २४ तासांत तापमानात मोठा फरक अपेक्षित नसला तरी त्यानंतर २-३ अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तारीखांनुसार हवामान अलर्ट..
७ जुलै (सोमवार) : ऑरेंज अलर्ट – चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, वर्धा (अतिशय मुसळधार पावसाचा धोका); यलो अलर्ट – अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा
८ जुलै (मंगळवार) : ऑरेंज अलर्ट – नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली; यलो अलर्ट – वाशीम, गोंदिया, वर्धा, अकोला, बुलढाणा.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, या काळात रस्त्यांवर पाणी साचणे, वाहनचालकांसाठी अडथळा, दृश्यता कमी होणे अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच, काही भागांत भूस्खलन होण्याची आणि पिकांचे नुकसान होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनीही सतर्क रहाण्याचे निर्देश दिले असून, विशेषतः निचांकी व अतिसंवेदनशील भागात राहणाऱ्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी पाऊस दिलासा देणारा असला तरी मुसळधार पावसामुळे होणाऱ्या संभाव्य नासधूस त्या भागांवर लक्ष देणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या हवामान बदलावामुळे लोकजीवनावर वावर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सज्ज राहिले आहे.

