लोकशाही न्यूज नेटवर्क

यंदा सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्याला देखील जोरदार पावसाचा तडाखा बसल्याने शेतातील पीक नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील पिकाचे नुकसान यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी, मुलांचे शिक्षण यात सर्वांची विवंचना वाढल्याने शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील दहिटण गावातील लक्ष्मण काशिनाथ गावसाने (वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. अतिवृष्टी, आर्थिक अडचणी व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळता न आल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना वैराग-मोहळ रोडवरील एका वस्तीजवळ घडली. मृतक गावसाने यांच्याकडे केवळ दीड एकर शेती होती. गेल्या चार महिन्यांपासून नदीला आलेल्या पुरामुळे त्यांना शेतीत जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.
मी आत्महत्या करीत आहे…
शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीत गावसाने यांनी “सततचा पाऊस, अतिवृष्टी व शेतातील नुकसान यामुळे मी आत्महत्या करीत आहे. माझ्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी. माझ्या मुलांचे शिक्षण सरकारने पूर्ण करावे. असा उल्लेख आहे. गावसाने यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ज्ञानेश्वर व मुलगी वैष्णवी असा परिवार आहे. यामुळे गावसाने यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शेती परवडत नसल्याने आर्थिक विवंचना वाढल्याने ते वैराग येथील किराणा दुकानात काम करत होते. दरम्यान घटनेच्या आदल्या दिवशी ते सकाळी घरातून बाजारात जाण्यासाठी निघाले होते. परंतु संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. रात्री उशिरा पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सकाळी गावकऱ्यांना वैराग- मोहळ रोडवरील वस्तीजवळील झाडाला गावसाने यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळाली.


