
हरिपाठ चिंतन : भाग ४८
सर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी ।
रिकामा अर्धघडी राहूं नको ॥१॥
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरिवीण ॥२॥
नाम मंत्र जप कोटी जाईल पाप ।
रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें ॥३॥
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी ।
इंद्रियांसवडी लपू नको ॥४॥
तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी ॥५॥
ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान ।
समाधी संजीवन हरिपाठ ॥६॥
सर्व सुखाची गोडी घे, चाख, साही शास्रांची निवड कर। सुख म्हणजे क्षणिक भौतिक, विषयसुख नाही. सर्वसुख म्हणजे ईश्वराचे सुख, ब्रम्हानंद, आत्मानंद। ज्या सुखाला सुरुवात ही नाही व अंत ही नाही असे ईश्वरीय सुख। वेद उपनिषदात सुखाची व्याख्या केली आहे, “यो वै भूमा। तत्सुखं।” ज्या सुखाला मर्यादा नाही, अमर्याद, अनंत असे ब्रम्ह सुख। हे सुख भक्ती किंवा ध्यान करतांना आपल्या आतूनच प्रगट होते.
अंतर्मुख होऊन पाहिले तर आत खरोखर सुखाचा महसागरच आहे, असे सर्व सिध्द-संत महात्मे सांगतात। त्यासाठी अंतर्मुख च व्हावे लागते, मग माध्यम भक्ती, ध्यान कोणतेही असो। सुख आपल्या अंतरीच आहे, फक्त अंतर्मुख होण्याची कला साधली पाहिजे. अशी सिध्दयोगाची शिकवण आहे. भगवद्गीतेत सात्विक-राजस-तामस सर्व सुखांचे सविस्तर ज्ञान आहे. आयुष्य अनमोल आहे, यातील एक क्षण सुध्दा वाया जाऊ देऊ नको। प्रत्येक क्षणाचा उपयोग अध्यात्मिक साधनेत केला पाहिजे. या अर्थाने “रिकामा अर्धघडी राहू नको।”
लटिका व्यवहार सर्व हा संसार ।
वायां येरझार हरिवीण-
“यो वै भूमा तत्सुखं नाल्पेऽस्ति सुखं।
आ रसो वै स: रसं लब्ध्वाऽऽनंदी भवति।
॥उपनिषद्॥”
तरि सुख ते गा किरिटी। दाविजेल तुज दिठी।
जे आत्मयाचे भेटी जीवासी होय॥१८-७७३॥
तेव्हा सागरी गंगा जैसी। आत्मा मीनल्या बुध्दी तैसी।
अद्वयानंदाची अपैसी खाणी उघडे॥१८-७९२॥
अगा सूर्योदय जालिया। सूर्य सूर्यचि पहावा धनंजया।
तेवी माते जाणावया। मीचि हेतु॥१५-४२५॥
या मनुष्य जन्मात जर ईश्वराला जाणले नाही, तर ईतर कितीही व्यवहार भौतिक सुखासाठी धडपड केली तर ते व्यर्थच आहे. कारण विषयसुख, भौतिक सुख हे मृगजळाप्रमाणे क्षणीक व भासमान आहे. आत्मसुख हेच नित्य, सहज आनंदरुप आहे, हा आनंद चिरकाल टिकणारा आहे. सर्व संसार खोटा आहे. देवच खरा आहे. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप । रामकृष्णीं संकल्प धरुनि राहें- नामजपाने कोट्यावधी पापांचा नाश होतो. कृष्ण नामस्मरणाचा मनात संकल्प करावा। स्ंकल्प केल्यानंतरच प्रयत्न केला जातो.
निजवृत्ति काढी सर्व माया तोडी । इंद्रियांसवडी लपू नको- मनाची वृत्ती जी बहिर्मुख आहे, त्या वृत्तीला अंतर्मुख करावे. “योगश्चित्तवृत्ति निरोध:॥” चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. मनाच्या वृत्तींना आवर घालून आत्मस्वरुपी स्थिर कराव्यात. सर्वमाया तोडी- सर्व आसक्तींचा त्याग कर. पूर्ण अनासक्त हो. भगवान श्रीकृष्ण भागवतात उध्दवाला उपदेश करतात, “त्वं तु सर्वं परित्यज्य स्नेहं सर्वबंधुषु। मय्यावेश्य मन: सम्यक् समदृग्विचरस्व गाम्॥नाथ भगवत-७-६॥ तू सर्व नातेवाईकांची आसक्ती सोडून दे, माझ्याच ठिकाणी तुझे मन लाव, आणि मग पृथ्वीवर कुठेही बिनधास्त फीर.
तीर्थी व्रतीं भाव धरी रे करुणा ।
शांति दया पाहुणा हरि करी
काळ सारावा चिंतने।
एकांतवास गंगास्नाने। देवाच्या चिंतने।
प्रदक्षिणा तुळशीच्या॥१॥ तुका॥
काही महत्वाची तीर्थ यात्रा कराव्या। तीर्थे, व्रते यावर भाव, श्रध्दा ठेवावी। पवित्र तीर्थ पुण्य क्षेत्र भ्रमण करावे। पंढरपूर, काशी प्रयाग सिध्दपीठ अशा ठिकाणी जावे। एकादशी, महाशिवरात्री अशी व्रते करावीत। त्यावर श्रध्दा ठेवावी। तीर्थ व्र व्रतांबरोबर शांति, दया, या गुणांचीही आवश्यकता आहे. हे नियम पाळले नाहीत व फक्त तीर्थयात्रा केल्या तर त्याबद्दल तुकाराम महाराज म्हणतात,
“जाऊनिया तीर्था काय तुवा केले।
चर्म प्रक्षाळीले वरी वरी॥१॥
अंतरीचे शुध्द कासयाने जाले।
भूषण तो केले आपणया॥२॥
वृंदावन फळ घोळिले साखरा।
भीतरील थारा मोडेचिना॥३॥
तुका म्हणे नाही शांती क्षमा दया।
तोवरी कायसा फुंदा तुम्ही॥४॥
श्रीहरी पाहुणा झाला पाहिजे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवीं ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ- हरिपाठाचा विचार केला असता असे दिसते की, ज्ञानेश्वर महाराजांना इतर कोणतेही प्रमाण मान्य नाही, फक्त हरिपाठ हेच प्रमाण मान्य आहे. ईश्वरज्ञानाच्या स्वरुपाचे ज्ञान करुन देणारे साधन हरिपाठच आहे. व हे हरिपाठाचे ज्ञान मला सद्गुरु निवृत्तीनाथांनीच मला दिले आहे असे ज्ञानेश्वर महाराजांचे स्पष्ट मत आहे. सद्गुरुंच्या कृपेनेच मला हरिपाठाचे ज्ञान झाले। हरिपाठाने सर्वांसाठी सहजपणे समाधी संजीवन होते. समाधी संजीवन व्हावे असे वाटत असेल तर नित्यनियमाने हरिपाठाचे अखंड चिंतन केले पाहिजे. हरिपाठ रोज म्हणण्याने, हरिपाठाचे सतत चिंतन केल्याने हरी म्हणजे सर्वत्र व्याप्त ईश्वराची साधकावर कृपा होते, व ईश्वर कृपेने, योग्य वेळी, पण खात्रीने प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होतो.
क्रमशः

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२

