हरिपाठ चिंतन : भाग २५
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित।
उगा राहे निवांत शिणसी वाया॥
माणसाला वाटते देवाचे भजन केले कि देव लगेच भेटला पाहिजे. देवाचा काही अनुभव आला नाही कि तो लगेच दुसरे उपाय शोधतो, दुसऱ्या मार्गांना लागतो. वेगवेगळे देव देवतांची व्रते करतो, सतत मार्ग बदलतो, एका ठिकाणी त्याचे लक्ष नसते अशा भक्ताला ज्ञानेश्वरीत व्यभिचारी भक्त म्हटले आहे. अशा भक्ताला काही प्राप्त होत नाही. नागपंचमीला नागांची उपासना, चतुर्थी ला गणपती, सोमवारी बेल घेऊन शंकराची उपासना, एकादशीला विष्णू, नवरात्रीला देवी ची उपासना. सतत देव बदलतो.
ऐसा अखंड भजन करी। उगा नोहे क्षणभरी।,
ऐसेनि जो भक्तु। देखसी सैरा धावतु।
जाण अज्ञानाचा मूर्तु।अवतार तो॥
॥ज्ञानेश्वरी-१३-८२३॥
असा एका ठिकाणी मन स्थिर नसणारा व देव बदलणारा भक्त हा साक्षात अज्ञानाचा अवतारच होय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात-
माझी मूर्ती निफजवी।
ते घराचे कोनी बैसवी।
आपण देवोदेवी यात्रे जाय॥१३-८१५॥
अज्ञानी भक्त माझी मूर्ती आणतो, ती घराच्या एका कोनाड्यात बसवतो, आणि स्वत: देवदेवतांच्या यात्रेला जातो.
नित्य आराधन माझे।
काजी कुळदैवता भजे।
पर्वविशेषे कीजे पूजा आना॥८१६॥
माझे अधिष्ठान घरी। आणि वोवसे आनाचे करी।
पितृकाऱ्यावरी पितरांचा होय॥८१७॥
एकादशीच्या दिवशी। जेतुला पाडु आम्हासी।
तेतुलाचि नागांसी। पंचमीच्या दिवशी॥८१८॥
चैथ मोटकी पाहे। आणि गणेशाचाचि होये।
चावदसी म्हणे माये। तुझाचि वो दुर्गे॥८१९॥
नित्य नैमित्तिके कर्मे सांडी। मग बैसे नवचंडी।
आदित्यवारी वाढी बहिरवा पात्री॥८२०॥
पाठी सोमवार पावे।आणि बेलेसी लिंगा धावे।
ऐसा एकलाचि आघवे। जोगावी जो॥८२१॥
ऐसा अखंड भजन करी। उगा नोहे क्षणभरी।
अवघेन गावद्वारी।अहेव जैसी॥८२२॥
रोज माझी पूजा करणे आवश्यक असतांना ती सोडून कूळदेवतेची पुजा करतो. विशेष पर्वणी आली कि तिसऱ्याच देवतेची पुजा करतो. माझी स्थापन केलेली असताना दुसऱ्या देवाला नवस करतो. श्राध्दकाळी पितरांची पुजा करतो. गणेश चतुर्थीला गणेशभक्त होतो. चतुर्दशीला देवीची पूजन करुन “हे अंबे दुर्गे!” मी तुझाच आहे, अशी मनोभावे प्रार्थना करतो. गावाव्या वेशीत बसलेली वेश्या जशी अखंड सौभाग्यवती असते असा हा भक्त असतो अशा शब्दात ज्ञानेश्वर महाराजांनी या अज्ञानी भक्ताचे वर्णन केले आहे.
उगा राहे निवांत शिणसी वाया- ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जरि अनुभव आला नाही तरी निवांत राहा। इतर मार्गांच्या मागे लागल्यास व्यर्थ शीण त्रास च होईल. नियमित साधना करीत राहिल्यास योग्य वेळी साधनेचे फळ मिळतेच असा दृढ निश्चय हवा. सायासे करिसी प्रपंच दिननिशी। हरिसी न भजसी कोण्या गुणे॥-मनुष्य रोज प्रपंच करतो, त्यातच गुरफटतो. भैतिक सुखांसाठी रात्रंदिवस कामे करतो, व म्हणतो कि मला देवाची भक्ती करायला वेळच मिळत नाही. तर भक्ती, साधना कशी करणार? असे काहीतरी बहाणे सांगून मनुष्य फक्त प्रंचातच मग्न राहातो, अध्यात्मिक साधना (जे मनुष्य जन्माचे मुख्य ध्येय आहे ते) करीत नाही. अशा मनुष्याला तुकाराम महाराज म्हणतात, तुला २४ तास काम करायला वेळ मिळतो पण अध्यात्मिक साधनेला मात्र वेळ मिळत नाही.
क्रमशः

रिटायर्ड मेडीकल ऑफिसर
नांदगाव, जि. नाशिक
मो. ९८२२४२८५७२