मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेता गोविंदाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसून दोघे लवकरच एकमेकांसपासून वेगळं होणार आहेत. दोघांनी आपलं 37 वर्षांचं लग्न मोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने काही मुलाखती दिल्या होत्या. यात सुनीताने गोविंदाबाबत अनेक खुलासे केले.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिने मोठा खुलासा केला होता की ती आणि गोविंदा सध्या एकत्र राहत नाहीत. यानंतरच लोकांनी गोविंदा आणि सुनीता यांचा घटस्फोट होणार असल्याची शंका व्यक्त केली होती. अशातच आता Reddit वर गोविंदाच्या बाबत एक पोस्ट व्हायरल होत असून यात अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीताचा घटस्फोट होणार असल्याचे म्हटले आहे. यात सांगण्यात आलं आहे की गोविंदा आणि सुनीता हे दोघे वेगवेगळे राहत आहे. सुनीता ही सध्या गोविंदाच्या बाजूच्या बंगल्यात राहत असून दोघांमधील अनेक गोष्टी जुळत नाहीत. सुनीताने गोविंदाचे अनेक अफेअर्स सुद्धा सहन केले, यासोबतच तिने गोविंदाच्या आईची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली.
गोविंदा आणि सुनीता यांनी घटस्फोटांच्या चर्चेवर अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. गोविंदा आणि सुनीता यांचं लग्न हे 11 मार्च 1987 रोजी झालं होतं. यंदा दोघांच्या लग्नाला 37 वर्ष पूर्ण होत आहेत. दोघांना यशवर्धन आणि टीना नावाची दोन मुलं आहेत. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात वयात जवळपास 10 वर्षांचं अंतर आहे. गोविंदाच्या मामाचे सुनीताच्या बहिणीशी लग्न झाले होते, त्यामुळे ते दोघेही एकमेकांना ओळखत होते. गोविंदाने ‘टॅन बडन’ या चित्रपटातून पदार्पण केले, जे सुनीताच्या मामाने बनवला होता. गोविंदा, सुनीता आणि तिचा भाऊ हे चित्रपटाच्या मुहूर्त शॉटनंतर कारमध्ये बसून एकत्र जात होते. शुटिंग दरम्यान गोविंदा आणि सुनीता यांनी एकमेकांकडे आकर्षित झाले आणि त्यांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. जवळपास तीन वर्ष सुनीता आणि गोविंदाने एकमेकांना डेट केलं. त्यानंतर 11 मार्च 1987 रोजी त्यांनी लग्न केले. सुनीताने मुलाखतीत सांगितले होते की गोविंदाच्या कारकीर्दीसाठी तो काळ महत्वाचा होता त्याचे दोन-तीन चित्रपट सुपर हिट झाले होते. यावेळी निर्माते म्हणायचे की जर गोविंदाच्या लग्नाची बातमी समोर आली तर लोकांमध्ये त्याची क्रेझ संपेल. म्हणून जवळपास 2 वर्ष गोविंदा आणि सुनीता यांनी जगापासून आपलं लग्न लपवलं.