जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यात वाघूर धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला असून त्यापाठोपाठ गिरणा पट्ट्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले गिरणा धरण ही जवळपास फुल्ल झाले आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. जलसंपदाच्या आकडेवारी नुसार सध्या गिरणा धरणात 99.22 टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी 65.73 टक्के पाणीसाठा होता. गिरणा धरणात पाणीसाठा वाढल्याने धरणातून 22 हजार 284 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण शंभर टक्के भरले असून धरणाचे दरवाजे 90 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. धरण भरल्याने 170 हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता दूर झाली आहे. तसेच सध्या गिरणा धरण प्रकल्पात एकूण 608.45 (द.ल.घ.मी) इतका पाणीसाठा आहे. त्यात मृत पाणीसाठा 84.90 (द.ल.घ.मी) इतका असून प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा 523.55 (द.ल.घ.मी) इतका आहे. आजचा पाणीसाठा हा 604.35 (द.ल.घ.मी) असून आजचा उपयुक्त पाणीसाठा 519.45 (द.ल.घ.मी) इतका आहे. गिरणा पट्ट्यात चाळीसगाव, मालेगाव, नाशिकच्या काही गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असून जळगावचा सिंचनाची चिंता दूर झाली आहे.
दरम्यान, हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोमवारी धरणात 37.41 टक्के इतका पाणीसाठा होता, आज त्यात 3.96 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. हतनूर धरण क्षेत्रात आणखी पावसाची गरज आहे. सध्या 41.37 टक्के पाणीसाठा आहे. एकूणच धरण क्षेत्रात येत्या काही दिवसात पाऊस झाला तर भुसावळकरांची पाण्याची चिंता मिटेल अन्यथा पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. तसेच वाघूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाले असून जलसाठा 71.8 टक्के इतका झाला आहे.


