लोकशाही न्यूज नेटवर्क
एखादा व्यक्ती संपत्तीने नाही तर, मनाने श्रीमंत असली पाहिजे असं आपण वारंवार म्हणतो. मात्र याची प्रचिती आता धाराशिव जिल्ह्यात आली आहे. पैसे असून उपयोग नाही, देण्याची दानत असली पाहिजे. या म्हणीला सत्यात उतरवत धाराशिवमधील एका आजीने सर्वानाच आश्यर्यचकित केले आहे. समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला विठुरायाच्या चरणी या आजीने स्वतःची ६ एकरची शेती विकून सोन्याची आभूषणे अर्पण केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथील वाघे आजीने स्वतःची जमीन विकून आतापर्यंत एक दोन तर तब्बल विविध देवस्थानाला ५० लाख रुपायांचे दान केले आहे. धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गावच्या बाई लिंबा वाघे असं या ८० वर्षाच्या वृद्ध दानशूर आजीचे नाव आहे. वाघे आजी यांनी आपली स्वतःची जमीन विकून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी १८ लाखाचे सोने अर्पण काही दिवसांपूर्वी केले होते. त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
वाघे आजीच्या घरी लाईटही नाही
वाघे आजींनी आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ५० लाख रुपयांपेक्षा जास्त सोने, चांदी, अशा वेगवेळ्या स्वरूपात दान केले आहे. स्वतःची जमीन विकून एवढं दान करणाऱ्या वाघे यांच्या घरी जास्त बिल येतं म्हणून त्यांनी घरी लाईट सुध्दा घेतली नाही. वाघे आजी त्यांचं जेवण अजूनही चुलीवर बनवतात.
वाघे आजी यांनी यापूर्वी रुईभर येथील श्री दत्तमंदिरात कळसासाठी एक तोळे सोने, व एक किलो चांदी अर्पण केली होती. पळसवाडीतील मारुती मंदिरासाठी सात लाख रुपयांच्या मूर्ती, शिवाजीनगर (धाराशिव) येथील खंडोबा मंदिरात दोन लाख रुपयांच्या मूर्ती, अक्कलकोटच्या मंदिराच्या अन्नछत्रात भांडी दिली आहेत. तसेच बेंबळीतील खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धारही त्यांनी केला आहे.