यावल : तालुक्यातील पाडळसे परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, वन विभागाला अद्यापही या वाघाला पकडण्यात यश आलेले नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाडळसा व शिवारात दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन आणि पशुधनावरील सतत हल्ल्याच्या घटना वाढत असल्यामुळे या परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. भोरटेक येथील गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून एका म्हशीला ठार केल्याच्या घटनेनंतर वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. मात्र, अनेक प्रयत्न करूनही वन विभागाच्या पथकाला वाघाचा माग काढता आलेला नाही किंवा त्याला जेरबंद करता आलेले नाही. यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तसेच मंगळवारी संध्याकाळी पाडळसे येशील बाळू यादव कोळी शेळीपालन करण्यासाठी गेल्या असता त्यांच्या शेळीवर सुध्या त्या वाघाने हमला करून तिला ठार केले आहे.
रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा घराबाहेर पडणे ग्रामस्थांनी पूर्णपणे थांबवले आहे. शेतीची कामेही दिवसा लवकर आटोपून घेतली जात आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची चिंताही पालकांना सतावू लागली आहे. वाघ कधी आणि कुठे हल्ला करेल याचा भरवसा नाही, त्यामुळे आम्ही जीव मुठीत घेऊन जगत आहोत, अशी प्रतिक्रिया एका स्थानिक शेतकऱ्याने दिली.
वन विभागाने तातडीने अधिक प्रभावी उपाययोजना करून वाघाला पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वन विभागाने तातडीने पावले उचलून हा वाघ पकडला नाही, तर भविष्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.