धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना मोठा दणका बसला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दोंडाईचा शिवारातील तब्बल 26 एकर जमीन हडप केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे.
मंत्री जयकुमार रावल यांनी ही जमीन हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केले आहेत. दरम्यान याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याचे देखील माहिती पुढे आली आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांना देखील जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोडले नसून इतर गरीब कुटुंबीयांचे काय? असा प्रश्न देखील अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे. जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिंदखेडातील गरिबांना न्याय कोण देणार? असा देखील प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले मंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला म्हणून शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात ओळख आहे. खानदेशातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दोंडाईचा रावल संस्थानात (राजघराण्यात) त्यांचा जन्म झाला. ते सलग पाचव्यांदा भाजपाकडून आमदार राहिले आहेत. त्यांनी दोंडाईचा नगरपालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. 28 व्या वर्षी तत्कालीन मंत्री हेमंत देशमुख यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. त्यांनी इंग्लंडमधील कार्डिफ विद्यापिठात बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.
2004, 2009,2014, 2019 आणि 2024 असे सलग पाचवेळा त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी मिळवला आहे. तर 2016 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबीनेटमंत्रीपदी जयकुमार रावल यांची निवड झाली. पर्यटन, अन्न औषध, राजशिष्टाचार या खात्याचा कारभार त्यांनी सांभळला. तर 2014 च्या निवडणूकीत पाचव्यांदा त्यांनी 96 लाख मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, धुळे जिल्ह्यात पहिल्यांदा महायुतीचे सर्व 5 आमदार निवडून आणण्यात आ. रावल यांचा मोठा वाटा असल्याचेही बोलल्या जात आहे. त्यात आता जयकुमार रावल यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडली आहे.