लोकशाही न्यूज नेटवर्क

विमानतळावर वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एका जिल्ह्यात विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या खासगी चारचाकी वाहनांमुळे टर्मिनल परिसरात होणारी गर्दी आणि वाहतूक अडथळे लक्षात घेऊन आता १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. हा निर्णय पुण्यात घेण्यात आला आहे. पुणे विमानतळ प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव दिल्ली येथील मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या पुणे विमानतळावर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी अनेक नागरिक खासगी वाहनांमधून विमानतळावर येतात. मात्र, अनेकदा नातेवाईकांची वाट बघत आपली वाहने टर्मिनलसमोर बराच वेळ उभी ठेवतात. काहीवेळा हे वाट पाहणं अर्धा तास ते एक तासांपर्यंतही वाढते.
परिणामी, टर्मिनल परिसरात वाहनांच्या रांगा लागतात आणि वाहतुक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे विमान पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना वेळेत टर्मिनलपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. तसेच विमानतळ परिसरातील इतर वाहनांच्या हालचालींवरही याचा परिणाम होतो. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन उभे ठेवणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल. यासाठी वेळेची नोंद ठेवणारी यंत्रणा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना विनाकारण थांबणे टाळावे लागेल. या निर्णयामुळे विमानतळ परिसरातील अनावश्यक गर्दी कमी होईल, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि प्रवाशांना वेळेत विमानतळावर पोहोचणे सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पुणे विमानतळ प्रशासनाचा हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.


