लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी व्यावसायिक केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा ट्रेकिंग अपघात असल्याचे वाटत होते. मात्र लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात ही घटना पूर्वनियोजित खून असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन यांनी मिळून ही हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणात काही ठोस पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात आता केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोठे आरोप केले आहेत. त्यांनी सिया गोयलवर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, “पुण्यातील सिया प्रवीण बसेसर गोयल ही मुलगी आधीपासूनच अनैतिक संबंध ठेवून होती. तिने आमच्या साध्या-भोळ्या मुलाशी लग्नाचा बनाव केला. तिच्या चारित्र्याबद्दल आणि भूतकाळातील वर्तनाबद्दल तिच्या कुटुंबाला पूर्ण माहिती होती, तरीही त्यांनी सत्य लपवले आणि आमची फसवणूक केली.” विशाल अग्रवाल यांनी पुढे म्हटले, “आम्हा पीडित पालकांच्या मनात शाप आणि न्यायाची तीव्र इच्छा आहे.”
विशाल अग्रवाल यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला आहे. ते म्हणतात, “या मुलीने यापूर्वीही केतनचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता, जो अयशस्वी ठरला. शेवटी १८ जूनला तिने आपल्या मित्राच्या मदतीने आमच्या मुलाचा क्रूरपणे खून केला.” प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, “जर तिला लग्न करायचे नव्हते तर सहजपणे नाते तोडता आले असते. मग आमच्या निष्पाप मुलाचा जीव घेण्याची गरज काय होती? या अपूरणीय हानीची भरपाई कोण करणार?”
केतनच्या वडिलांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे की, आरोपींनी लोहगडावर यश न मिळाल्यास महाबळेश्वरला नेऊन केतनचा खून करण्याचा प्लॅन तयार केला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण घटना अधिक गंभीर आणि चिघळलेली असल्याचे दिसून येत आहे. पोलिस या सर्व आरोपांची सखोल चौकशी करत आहेत आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाने पुण्याच्या व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ निर्माण केली आहे.


