लोकशाही संपादकीय लेख

7 जून रोजी दर वर्षाप्रमाणे मान्सूनचे आगमन होईल, या आशेवर शेतकरी असतो. परंतु प्रत्येक वर्षी मान्सूनचा दगा फटका हा चालूच असतो. यंदा केरळमध्ये मान्सून आला, तर कोपऱ्यातही त्याने हजेरी लावली. बाकी इतर ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये 15 जून पर्यंत मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. परंतु वारे फिरले. 15 जून ऐवजी मान्सून 20 जून पर्यंत येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कोकणातही मान्सून पहिले बरसला, त्यानंतर त्याचा जोर कमी झाला. तेथूनही तो गायब झाला. आता कुठे त्याने पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबईला नुसते ढग येतात. पस्तीस अंश डिग्री सेल्सिअसच्या तापमानात मुंबईकर उकडून निघत आहेत. असह्य उकाडा मुंबईकर सहन करत आहेत. बाकी इतर जिल्ह्यात त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगलीच पाठ फिरवली आहे. काही शेतकऱ्यांनी धूळ कपाशीची पेरणी केली आहे. पावसाचा भरवसा काय? आज येईल.. उद्या येईल.. असे ढगाकडे पाहून शेतकरी पावसाची वाट पाहतो आहे. परंतु यंदा पावसाचे ढग सुद्धा नाहीत. नुसतेच वारगट वाहते आहे. तेव्हा कशाकडे पाहून आपली आशा व्यक्त करतो तेच कळत नाही. धूळपेरणी व्यतिरिक्त ज्याच्याकडे विहिरीचे पाणी आहे, त्या पाण्यावर कपाशीची लागवड केली आहे. पण विहिरीचे पाणी पुरत नसल्याने त्यांना सुद्धा पावसाची प्रतीक्षा करावी लागते आहे. एकंदरीत शेतकरी मान्सूनची चातकासारखी वाट पाहतो आहे. पण पाऊस फुलकावणी देत आहे. ढगही येत नाहीत. त्यामुळे इथून तिथून पार आशा मावळली आहे. पाऊस पडला पडत नाही तोपर्यंत शेतकरी आनंदी होणार नाही. 22 जूनला पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यासमोर फार मोठ्या अडचणी निर्माण होतील यात शंका नाही. त्यात धूळपेरणीची खते वाया जातील. पुन्हा बियाण्यासाठी आणि खतासाठी शेतकऱ्यांना नवीन खर्च करावा लागतो. नवीन बियाणे व खतासाठी कर्ज घेणे आले. कर्जाच्या या दुष्चक्रात शेतकरी तर दरवर्षी अडकतच राहतो. त्याला इलाज नाही. जर 22 जूनला पाऊस आला तर धूळपेरणी केलेले पीक हाती येण्याची दाट शक्यता आहे. आणि पाण्यावर ज्यांनी कपाशीची पेरणी केली आहे त्यांची कपाशी चांगली येण्याची शक्यता आहे. त्यानंतर शेतकरी इतर खरीप पिकांची पेरणीची वाट पाहत आहे. खरिपाची ज्वारी, तूर, मका, मूग, उडीद, बाजरी ही पिके पेरणीसाठी त्याला पाऊस चांगला हवा आहे. काय होते हे पाहायचे आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या नशिबी पावसाची वाट पाहणे हे आलेच. पाऊस वेळेवर आला तर चांगले, वेळेवर नाही आला तर त्याच्या पिकाचे उत्पादन घटते. त्याचे उत्पन्न कमी येते. परंतु पेरणी झाली त्यातही पावसाने दडी मारली की पिकांची वाढ खुंटते आणि त्याच्या उत्पन्नावर परिणाम होतो. त्यात पावसाची दडी फार मोठी असली की पिके वाळून जळून जातात. म्हणजे खरिपाची पेरणी वाया जाते. मग खरीपाच्या ठिकाणी रब्बीची पेरणी करणे आले. हे दुष्चक्र शेतकऱ्यांच्या नशिबी चालूच राहते. मग शासनाकडे मदतीची याचना वगैरे आली. मग एकरी इतकी इतकी मदत द्या, असा आग्रह चालू असतो.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भारतात सर्वात जास्त आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हे दुष्चक्र चालूच राहणार यात शंका नाही. त्यासाठी शेतीचे सिंचन क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. एक तर मोठ्या प्रमाणात शेतीचे सिंचन क्षेत्र हे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात महाराष्ट्रात धरणांची संख्या फार कमी आहे. जे शेतकरी सिंचनासाठी धरणे केली आहेत, उदाहरणार्थ हातनुर धरण हे शेतकऱ्यांसाठी केले आहे. पण याचा जास्तीत जास्त उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो. त्यामुळे हातनुर धरण, गिरणा धरण, वाघुर धरण यांचा उपयोग सिंचनापेक्षा जास्त पिण्याच्या पाण्यासाठीच होतो. जर पाऊस जास्त झाला तर पिकाच्या पाण्याचा प्रश्न मिटतो आणि त्यावेळी या धरणातील पाण्याची सिंचनासाठी उपयोग केला जातो. पण पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिल्यामुळे बहुतेक धरणातील पाणी पिण्यासाठीच वापरले जाते हेही तितकेच खरे आहे. बाकी धरणे निम्न तापी धरण हे प्रलंबित आहे. तीस वर्षे झाली अद्याप त्याचे काम चालूच आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांना खास शेतीचे सिंचन उपलब्ध व्हायला हवे. ते झाले तरच शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ शकतो. आता तर नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याला जर पूर्णता मिळाली तर अर्ध्या जळगाव जिल्ह्याला त्याचे पाणी मिळेल. सिंचन आणि पिण्याचे पाणी दोन्हींसाठी त्याचा उपयोग होणार आहे. परंतु या योजनेला अजून मूर्त स्वरूप आलेले नाही. ते होईल तेव्हा होईल. मात्र ते केव्हा होईल हे देखील सांगता येत नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांना पावसावरच अवलंबून राहावे लागणार आहे..!


