एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील पिंपळकोठा येथे राजू सुकलाल मराठे (वय 53) यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना 18 जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.
पिंपळकोठा येथील राजू सुकलाल मराठे यांच्याकडे सोसायटीचे कर्ज, खाजगी कर्ज, हात उसनवारी असे मिळून सुमारे चार ते पाच लाखाचे कर्ज होते, ते कसे फेडायचे ही विवंचना त्यांना त्रस्त करीत होती. तसेच गेल्या काही दिवसांपासून सध्या सतत होत असल्या पावसामुळे शेतात पिकापेक्षा तण जास्त मोठे झाले होते.
या पार्श्वभूमीवर राजू मराठे यांनी त्यांच्या शेतात असलेल्या निंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास काशिनाथ पाटील, मिलिंद कुमावत, अकिल मुजावर, पंकज पाटील, अनिल पाटील करीत आहे. राजू मराठे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून असा परिवार आहे.