सावकारी कर्जाने घेतला तरुण शेतकऱ्याचा जीव

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची (Farmers in Maharashtra) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. जरंडी ता. सोयगाव (Soygaon) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने (Farmer) साडेतीन लाखांच्या सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दीपक जनार्दन सुस्ते (वय ३२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. जरंडीत दीपक सुस्ते पत्नी स्वाती, मुलगी प्रांजल (वय ८), मुलगा पीयूष (वय अडीच) यांच्यासह वास्तव्यास होते. दीपक यांच्या वाट्याला दीड एकर शेती आली होती. पती- पत्नी दोघेही शेतात कष्ट करायचे. त्यांनी शेतात मोसंबी आणि कापूस पेरला होता.

मात्र निसर्गाने साथ न दिल्याने पीक येऊ शकले नाही. पेरणी, फवारणी, मजुरी, कीटकनाशके, कुटुंबाचे आजारपण तसेच अनेक कारणाने दीपक यांनी खासगी सावकाराकडून वेळोवेळी घेतलेले कर्ज साडेतीन लाख रुपये झाले होते. इतकेच नव्हे तर स्वतःचे शेत करून दीपक शेजारीच दुसऱ्या शेतातही मजुरी करू लागला. दरम्यान सावकाराने पैशांसाठी तगादा लावल्याने आणि शेतजमीन जाण्याच्या दडपणाखाली असल्याने दीपक सुस्ते यांनी आत्महत्या केली.

गुरुवारी सकाळी दीपक सुस्ते लवकरच शेतात गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास फवारणी करताना दीपकने फवारणीचे औषध प्राशन केले. त्यामुळे ग्लानी येऊन पडल्यावर शेतात सोबत काम करणाऱ्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारील शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्यांनी उचलून जळगावच्या दिशेने धाव घेतली.

दरम्यान जिल्‍हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान दीपकची प्राणज्योत मालवली.

Leave A Reply

Your email address will not be published.