
लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. उद्धव ठाकरे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे यांच्यासह ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येत आहे. या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी ही निवडणूक घेतली जात आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. राष्ट्रवादीकडे अतिरिक्त १३ मतं आहेत, अशात महायुतीने आणखी उमेदवार देण्याचे ठरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
विधान परिषदेच्या ९ जागांसाठीचे मतदान १२ मे २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडणार आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. विधानसभेच्या सदस्यांद्वारे (आमदारांमार्फत) निवडून आलेले उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, संजय केणेकर यांसारख्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत असल्याने ही निवडणूक घेतली जात आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया १३ मे २०२६ पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना २३ एप्रिल २०२६ रोजी जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२६ आहे. अर्जांची छाननी २ मे २०२६ रोजी केली जाईल. ज्या उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी ४ मे २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी मतदान १२ मे २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत पार पडेल. मतदानानंतर त्याच दिवशी म्हणजे १२ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मतांची मोजणी केली जाईल.

