लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सात जागा या महाराष्ट्रातील आहेत. महायुतीच्या वाट्याला सहा जागा तर एक जागा महाविकास आघाडीच्या खात्यात येणार आहे. या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवण्यात येणार का, याची चर्चा रंगली आहे. राज्यसभेसाठी 5 मार्चपर्यंत अर्ज करता येईल. तर 16 मार्चपर्यंत मतदान करता येणार आहे. सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा येत्या 2 एप्रिल रोजी संपणार आहे.
महाराष्ट्रातील 7,पश्चिम बंगाल आणि बिहारमधील 5-5 जागांवर निवडणूक होईल. तामिळनाडूच्या 6 जागांवर निवडणूक होईल. राज्यातील फौजिया खान, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार आहेत. हे सर्व येत्या 2 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत.
राज्यसभेच्या 37 जागांसाठी 26 फेब्रुवारी रोजी नोटिफिकेशन देण्यात आले. 5 मार्चपर्यंत उमेदवार अर्ज भरू शकतील. 6 मार्चपर्यंत अर्ज छाननी होईल. 9 मार्च रोजीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येईल. 16 मार्च रोजी मतदान प्रक्रिया होईल. सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर संध्याकाळी 5 वाजेपासून मत मोजणी होईल. 20 मार्चपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल.
दोन वर्षांपूर्वी राज्यात 2024 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यात भाजपचे 131, एकनाथ शिंदे शिवसेनेचे 57, अजित पवार पक्षाचे 40 असे महायुतीचे एकूण 228 आमदार निवडून आले आहेत. अपक्षांचा पाठिंबा घेऊन राज्यसभेवर महायुतीचे सहा खासदार निवडून जातील. यामध्ये भाजपचे चार तर मित्र पक्ष शिंदेसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक खासदार निवडून जाईल.

