लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास भाजप व शिंदे गटात असंतोष उफाळून येईल. त्यामुळे या असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून विस्तार केला जात नसल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी रविवारी कल्याणमध्ये केली. लेवा पाटीदार समाजाच्या मेळाव्यासाठी आलेल्या खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
एकनाथराव खडसे म्हणाले कि, सरकार स्थापन होवून सात महिने झाले मात्र आजही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. १८ मंत्री या राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे योग्य ते निर्णय होवू शकत नाही जनसंपर्क कमी पडत असून सरकारमधील सर्वच आमदार मंत्रीमंडळात यायला इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला घ्यावे हा पेच असल्याने विस्तार होत नाही. विस्तार झाल्यास असंतोष उफाळेल आणि त्याला तोंड देण कठीण जाईल म्हणून विस्तार लांबणीवर पडल्याकडे खडसे यांनी लक्ष वेधले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली मात्र याबाबत युतीचा प्रस्ताव किंवा कुठलेही बोलणे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झालेले नाही त्यामुळे प्रस्ताव आल्यानंतर वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील असे आ. खडसे यांनी सांगितले.
सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झाले. अलीकडे राज्यात महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आहेत इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जातात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली.