“शिंदेंच्या बंडामुळेच बिहारमध्ये सरकार कोसळले”- एकनाथराव खडसे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी बिहारमधील राजकीय भूकंपावर प्रतिक्रिया देत एकनाथ शिंदे यांना टोला दिलाय. बिहारमध्ये भाजपाशी असलेला वाद टोकाला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देत भाजपाशी असलेली युती तोडली आहे. यासंदर्भात एकनाथराव खडसे म्हणाले की, “महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळलं”.

काय म्हणाले खडसे

“बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजापाची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाशी युती केली. ज्यावेळी भाजपा केंद्रात सत्तेत आली होती. त्यावेळी त्यांच्या सोबतील अनेक मित्रपक्ष होते. पंजाबमध्ये अकाली दल, महाराष्ट्रात शिवसेना तसेच अटजींच्या नेतृत्वात तृणमूलही भाजपासोबत होते. मात्र, हळूहळू सर्व पक्ष भाजपापासून दूर गेले. एकमेव नितीश कुमार राहिले होते, ते सुद्धा आज बाहेर पडले आहेत. भाजपा आमच्या कामकाजात सातत्याने दखल देत होती, असा आरोप नितीशी कुमार यांनी केला आहे. तशाच प्रकारचे आरोप अन्य पक्षांनीही सोडून जाताना केले होते. नितीश कुमारांनी देशभरात एक मोठं उदाहरण दिलं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळलं, अशी आजची परिस्थिती आहे”, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.

आज शपथविधी

तर कालच्या दिवशी बिहारच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पार्टीसोबतची युती तोडत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षासोबत युती केली आहे. त्याचबरोबर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून वेळही घेतला आहे. भाजपा-जेडीयूचं सरकार कोसळल्यानंतर, आज दुपारी दोन वाजता नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आठव्यांदा शपथ घेणार आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. बिहारच्या राजभवनात आज हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.