एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत!
चौघा मंत्र्यांचे टोचले कान : मंत्रीपदावर कुणाची लागणार वर्णी?
मुंबर्इ : शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश-अपयश लक्षात घेऊन पक्षात बांधणी केली जाणार आहे.
कोकण पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यावरून एकनाथ शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले असून लवकरच मंत्रीमंडळात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असल्याचे कळते. निवडणुकीत मिळालेले यश-अपयश लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना दिलेल्या आहे. निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो, का पडलो याची कारण मीमासा करण्याच्या सूचनाही दिलेल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंनी याबाबत पालिका निवडणूकीपूर्वीच मंत्र्यांना संकेत दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पालिका निवडणूक ही सेनेच्या मंत्र्यांसाठी लिटमस्ट टेस्ट होती असे बोलले जाते. त्यामुळे अकार्यक्षम मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवून शिंदे नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे समोर येत आहे. जिल्हा परिषद, नगराध्यक्ष आणि नगरपालिका निवडणुकीत पक्ष जरी दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरीही नेत्यांकडून झाली नसल्याने मंत्रिमंडळातून कोणाला डच्चू मिळतो आणि कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते हे पाहणे महत्वाचे आहे.
शिंदेंना मुंबईत फटका
पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी पक्षातील मंत्री आणि आमदारांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. मात्र ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाहीत. त्यामुळे जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या सुमार कामगिरीची गंभीर दखल घेत, शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने मेरिटवर प्रत्येक जागेवर चर्चा करून त्यातील फक्त 90 जागा शिवसेनेला दिला. या जागा देतानाही भाजपने भविष्यातील त्या जागांवरचा क्लेम लक्षात ठेवूनच त्या जागा शिवसेनेला सोडल्या, यातही शिंदेंनी अनेक जागा घराणेशाही म्हणून वाटल्या, यात तुकाराम काते वगळता इतर नेत्यांना त्यांच्या घरातील व्यक्ती निवडणूनच आणता आला नाही. यात माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलं, खासदार रविंद्र वायकर यांची मुलगी, राहुल शेवाळे यांची भावजय, आमदार अशोक पाटील, मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना पराभव पत्करावा लागला. मग काय म्हणून शिंदेंनी या नेत्यांकडे पाहून त्यांच्या मुलांना तिकीट दिल्या, असे प्रश्न स्थानिक कार्यकर्ता खासगीत उपस्थित करतात. ऐन निवडणुकीत शिंदेना जागा वाटप चर्चा आणि युतीत कल्याण डोबिंवली, ठाणे अंबरनाथ इथेच बांधून ठेवले. याचाच प्रमुख फटका मुंबईत बसल्याचे बोलले जात आहे.