..म्हणून शिंदेंची मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार ?
भाजपाच्या आकड्याने ‘गणित’ बिघडले : मिळेल ते घेण्यास राष्ट्रवादी, सेना तयार
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
तुम्हाला आमच्यामुळे कुठेही अडचण येईल, असे आम्ही काहीही करणार नाही. कोणताही निर्णय घ्या…निर्णय घेताना माझी अडचण आहे, असे काही वाटून घेऊ नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे यांनी दिली. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का घेतली, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
भाजप वरिष्ठांनी तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने एकनाथ शिंदे यांना माघार घ्यायला लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 130 पेक्षा जागा मिळतील, असा कोणालाच अंदाज नव्हता. भाजपच्या नेत्यांना देखील इतक्या जागा मिळतील असे वाटले नव्हते. भाजपचा आकडा 132 पर्यंत पोहचला आणि शिंदे गटाचे सर्व गणित बिघडल्याचे बोलले जात आहे.
अमित शाह, नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इथे उभा आहे, एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले. कुठही घोडं अडलेलं नाही. मी कुठेही काही अडून धरलेले नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही नाराज वगैरे नाही, आम्ही नाराज होणारे नाही लढणारे लोक आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय असा ऐताहासिक विजय असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.