लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठा आरक्षणाच्या निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलावलं आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता मराठा आरक्षणाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या पटलावर मंडल. तो मंजूर झाल्यानंतर विधेयकावर सभागृहात चर्चा सुरु झाली.
सुरुवातीला आरक्षणावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजचा निर्णय हा मराठा आंदोलकांच्या एकजुटीचा विजय आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी उभ्या केलेल्या लढ्याला यश येत आहे. लाखो मराठा बांधवांसाठी आजचा दिवस इच्छापूर्तीचा आणि ऐतिहासिक आहे.
“मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मला आंदोलकांच्या भावना लक्षात येतात. मराठा आरक्षणामुळे कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी काळजी सरकारने घेतली आहे.” शिंदे पुढे म्हणाले की, जेव्हा मराठा आंदोलकांचा उपोषण सोडण्याची वेळ आली तेव्हा-तेव्हा मी आंदोलकांना भेटलो आहे. मी मुख्यमंत्री आहे म्हणून प्रोटोकॉल पाळत नाही. बाळासाहेबांच्या शिकवणीवर चालणारा मी कार्यकर्ता असून स्वतःपेक्षा जनतेला प्राधान्य देण्याचं काम मी करतो.
सगेसोयऱ्याचा मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले…
कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने गतीने काम करण्यास सुरुवात केली सून, मराठवाड्यात पुरावे शोधण्याचही काम सुरु आहे. सगेसोयऱ्यांच्या बाबतीत जी अधिसूचना सरकारने काढलेली होती त्यावर ६ लाख हरकती आलेल्या आहेत. त्या हरकतींची छाननी सुरु आहे. त्यावर काम सुरु असून त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. आज मी त्याच्या डिटेल्समध्ये जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.