जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे.
मतभेद विसरून एकमेकांकडे..
एकनाथ खडसे म्हणाले की, राजकारणामध्ये एकमेकांविषयी आदराची आणि सन्मानाची भावना आपण नेहमीच ठेवत आलेलो आहोत. त्यामुळे सारे राजकीय मतभेद विसरून एकमेकांकडे जाण्याची आपली प्रथा आहे. या प्रथेनुसार अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले आहेत. तसेच “कुठल्याही पक्षाच्या नेत्यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम असेल की सर्वपक्षीय नेत्यांची जाण्याची आपल्या राज्याची एक चांगली परंपरा आहे.
कोणालाही गृहमंत्री नेमा
तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे तरी कुठे? आमदाराच्या मामाला पळवलं जातं आणि खून केला जातो. राज्यात अलिकडे पाहिले तर दिवसाढवळ्या खून, चोऱ्या, दरोडा हा व्हायला लागलेला आहे. राज्यामध्ये गृहमंत्री कोण आहे? मुख्यमंत्री आहे की नाही? हेच लक्षात येईनासे झालं आहे”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी पुण्याच्या आणि परभणीच्या घटनेवरून नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. “कोणालाही गृहमंत्री नेमा आणि राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात आणा”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
अजून तर सुरुवात
यावेळी एकनाथ खडसे यांना ऑपरेशन लोटस याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फक्त एका वाक्यात उत्तर दिलं. “चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितलेलं आहे की, आम्ही असं कुठलंही ऑपरेशन राबवणार नाहीय”, असं एकनाथ खडसे म्हणाले. शिवसेनेची शक्ती कमी करण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ही “अजून तर सुरुवात आहे, एकमेकांविरुद्धच्या अविश्वासाची. आगे आगे देखो होता है क्या”, अशी प्रतिक्रिया दिली.
खातेवाटपात भाजपचा वरचष्मा
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल एकनाथ खडसे म्हणाले की, “राज्यात महायुतीला बहुमत मिळून बरेच दिवस झाले आहेत. एक गठ्ठा बहुमत असताना सुद्धा त्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी व्हायला सुद्धा वेळ लागला. महायुतीतील तीनही पक्षांमध्ये मतभेद नसावेत. एकमेकांविषयी अजूनही अविश्वासाची भावना नसावी. प्रत्येकाचा आपापल्या पक्षाला अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न असावा. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार दिवसेंदिवस लांबत असेल. खातेवाटपात भाजपचा वरचष्मा असल्याची चर्चा आहे. भाजपचे आणि त्यांना पाठिंबा देणारे अशी जवळपास 137 आणि 138 आमदार त्यांच्याकडे आहेत. बहुमतापर्यंत भारतीय जनता पार्टी आज आहे. त्यामुळे ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त वाटा मिळणार. हे यामध्ये नैसर्गिक आहे.
कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न
एकनाथ खडसे यांनी परभणीतील घटनेवर म्हणाले की, संविधानाचा अपमान कोणी करत असेल तर भावना दुखावणे स्वभाविक आहे. पण यातून हिंसाचार करणे, बसेस जाळणे, या घटना काही संयुक्त नाही. तसेच त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.